500 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अयोध्येमध्ये समस्त हिंदू धर्मियांचे दैवत प्रभू श्री राम हे प्राणप्रतिष्ठेसह 22 जानेवारीला आपल्या जन्मस्थानी विराजमान झाले आहेत. मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानंतर समस्त भारतीयांमध्ये राम मंदिराला भेट देण्याविषयीची उत्सुकता प्रचंड शिगेला पोहोचली आहे. अनेकांचा सध्याला ‘चलो अयोध्ये’चा मूड दिसतो आहे. या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर भारतामध्ये धार्मिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणामध्ये बहर आलेला आहे. येणाऱ्या काही वर्षांमध्ये धार्मिक पर्यटनाचा ट्रेंड कमालीचा वाढणार असल्याचे अंदाज बांधले जात आहेत. 12 दिवसाच्या कालावधीमध्ये अयोध्येमध्ये 24 लाख जणांनी आपल्या लाडक्या रामलल्लांचे दर्शन घेत समाधान व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठेसह दूरदर्शनवर थेट प्रक्षेपणाच्या कार्यक्रमामुळे राम लल्लांचे दर्शन दूरुन मिळालेले असले तरी आता प्रत्यक्ष भेटीबाबत अनेकांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे.
काशी यात्रेला जाणारे बहुतेक पर्यटक आता अयोध्येच्या राम मंदिराला भेट दिल्याशिवाय परतणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ असणार आहे. अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी आसाम राज्याच्या दौऱ्यासंदर्भात तेथील विकासकामांना 11 हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली असून त्या राज्यामध्ये पर्यटन व पायाभूत सुविधांच्या दृष्टिनेही प्रकल्प आकाराला येणार आहेत. यामुळे आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिराची लोकप्रियताही वाढणार आहे. रोजच्या लाखोंच्या संख्येने होणाऱ्या पर्यटकांच्या आगमनामुळे अयोध्येत आता हॉटेल उद्योगालाही चालना मिळणार आहे. 4233 कोटींची तरतूद हॉटेल उद्योगासाठी करण्यात आली असून 142 हॉटेल्सची निर्मिती सुरू आहे. या आधी कधी नव्हे ते आयोध्या शहरामध्ये प्रचंड विकासाची कामे होत आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे धार्मिक पर्यटनासाठी आता अयोध्या इतर शहरांच्या तुलनेमध्ये आघाडी घेणार असून वाढत्या पर्यटकांमुळे येथील स्थानिक व्यावसायिकांना व्यवसाय मिळणार आहे. विविध भागांमध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम पालिकेकडून सुरु असून त्यासाठी व्यावसायिकांचेही त्यांना सहकार्यही लाभत आहे.
दुसरीकडे राम मंदिरासाठी स्थापलेल्या ट्रस्टकडून तिरुपती मंदिरातील भाविकांच्या गर्दीच्या व्यवस्थापनाबाबत अभ्यास केला जात असल्याचेही सांगितले जात आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानाला दररोज जवळपास 60 हजारहून अधिक भाविक भेट देत असतात. या भाविकांच्या गर्दीचे नियोजन कशाप्रकारे केले जाते, याचा अभ्यास ट्रस्टतर्फे केला जाणार आहे. त्याप्रमाणे अयोध्येतही तसे नियोजन केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिरुपती मंदिराला दरवर्षी अंदाजे अडीचकोटी भाविक भेट देत असतात. मदुराई तामिळनाडूतील मीनाक्षी अम्मन मंदिर हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक भाविक भेट देणारे मंदिर असून तिसऱ्या नंबरवर शिर्डीतील साईबाबा मंदिर आहे. त्यापाठोपाठ केरळमधील शबरीमलातील अय्यप्पा स्वामी मंदिर आणि अमृतसरमधील सुवर्णमंदिर या मंदिरांचा नंबर लागतो. आता या यादीत अयोध्येतील राम मंदिराचा समावेश होईल. अर्थातच रोजच्या वाढत्या भाविकांमुळे राम मंदिर ट्रस्ट व एकंदरच अयोध्या शहरावरती आगामी काळामध्ये दबाव मात्र राहणार आहे. तो कशापद्धतीने हाताळला जातो. हे पहावे लागणार आहे. विमानसेवा व रेल्वे सेवाद्वारे अयोध्येला जास्तीत जास्त भाविकांना दूरवरच्या राज्यातून कसे येता येईल याचे नियोजन केंद्र स्तरावर केले जात आहे. सध्याला तरी भारतातला मूड ‘चलो अयोध्या’ असाच आहे.