: मुख्यमंत्र्यांची खुर्ची कायम, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार
वृत्तसंस्था/ रांची
हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर झारखंडमध्ये मुख्यमंत्री झालेल्या चंपई सोरेन यांनी सोमवार, 5 फेब्रुवारी रोजी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. फ्लोअर टेस्टमध्ये 81 सदस्यीय झारखंड विधानसभेत चंपई सोरेन यांच्या समर्थनार्थ 47 तर 29 आमदारांनी विरोधात मतदान केले. अपक्ष आमदार सरयू रॉय यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही. विधानसभेत मतदानावेळी 77 आमदार उपस्थित होते. दरम्यान, आता ‘विश्वास’ संपादन केल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा मार्ग सुकर झाल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यानुसार येत्या दोन-चार दिवसातच मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत मिळत आहेत.
विश्वासदर्शक ठरावाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सकाळी अकरा वाजता सुरू झाले. कामकाजानंतर सभागृहात विश्वासदर्शक ठरावावर चर्चा होऊन मतदान घेण्यात आले. मतदानात 47 आमदार चंपई सोरेन सरकारच्या बाजूने तर 29 सदस्य विरोधात उभे राहिले. अशाप्रकारे चंपई सोरेन यांच्या सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. मार्क्सवादी-लेनिनिस्ट (लिबरेशन) कम्युनिस्ट पक्षाच्या एकमेव आमदाराने झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) सत्ताधारी युतीला बाहेरून पाठिंबा दिला. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीकडे भाजपचे 26 आणि 3 ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन (एजेएसयू) पक्षाचे आमदार आहेत. सभागृहातील मतदानावेळी अपक्ष आमदार सरयू राय तटस्थ राहिले तर अमित यादव आणि इतर आमदार सभागृहाच्या कामकाजात उपस्थित नव्हते. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील फ्लोअर टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी ईडीच्या ताब्यात विधानसभेत पोहोचले होते. मात्र, ते प्रसारमाध्यमांशी बोलले नाहीत.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हेमंत सोरेनला गेल्या आठवड्यात मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. यानंतर जेएमएम विधिमंडळ पक्षाचे नेते चंपई सोरेन यांनी 2 फेब्रुवारी रोजी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. चंपई सोरेन यांना सभागृहात त्यांच्या सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी 10 दिवसांचा अवधी देण्यात आला होता. मात्र, तत्पूर्वीच 5 फेब्रुवारीची तारीख निश्चित करत सरकारने बहुमत सिद्ध केले आहे.
आमदारांना एकसंध ठेवण्यात ‘झामुमो’ यशस्वी
हेमंत सोरेन सध्या ईडीच्या कोठडीत असतानाही झारखंड मुक्ती मोर्चाने आमदारांचे विभाजन रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. हेमंत सोरेन यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने विश्वासदर्शक ठरावात भाग घेण्याची परवानगी दिली होती. त्याचदरम्यान सत्ताधारी आघाडीच्या सुमारे 38 आमदारांना 2 फेब्रुवारी रोजी तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे नेण्यात आले होते. विश्वासदर्शक ठरावापूर्वी भाजपकडून घोडेबाजार होण्याची भीती गृहीत धरून झामुमोने पहिल्यापासूनच मोर्चेबांधणी केली होती. अंतिम टप्प्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते शिबू सोरेन यांनीही आमदारांना एकसंध राहण्यासाठी स्वत: ‘वार्तालाप’ केला होता.