पुणे / प्रतिनिधी :
विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी मंत्र्यांची वेळ मागत आहे. मात्र, त्यांना वेळ मिळत नाही. कदाचित ते आरत्या, लोकांच्या घरी जाण्यात व फोटो काढण्यातच व्यस्त असतील. त्यामुळे त्यांना मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी वेळ नसेल. मी जेव्हा-जेव्हा त्यांना टीव्हीवर बघते तेव्हा ते कोणाच्या ना कोणाच्या घरीच असतात,’ अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी लोकांची कामे करणे, त्याकरिता वेळ देणे अपेक्षित आहे. मात्र, केवळ आरती करणे, घरी भेट देणे व त्याचे फोटो काढणे, यातच ते व्यस्त आहेत. शिंदे गट आणि भाजपच्या सरकारवर टीका करताना सुप्रिया सुळे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाशी त्यांची तुलना केली. ‘शिंदे आणि भाजप सरकार स्थापन होऊन अडीच महिने झाले. मात्र अजून एकही पालकमंत्री नेमलेला नाही. आपल्याला आठवत असेल तर महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे पुणे शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून मॅरेथॉन बैठका घायचे. गेल्या अडीच वर्षात कोव्हिड किंवा अन्य कुठलीही परिस्थिती असताना कोणतेही काम अडलेले नाही,’ असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अधिक वाचा : ‘मविआ’ला दणका; राज्यपाल नियुक्त आमदारांची ‘ती’ यादी अखेर रद्द