साखर हंगाम सुरु, पण तोडग्याअभावी अनेक कारखाने बंद; तोडगा निघण्याची गरज
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 1 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरु झाला आहे. पण ऊस दराच्या तोडग्याअभावी अपवाद वगळता सर्व कारखाने बंदच आहेत. साखरेसह अन्य उपपदार्थांना गेल्या वर्षभरात चांगला भाव मिळाल्यामुळे गत वर्षात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 400 रूपयेंचा हप्ता आणि चालू गाळप हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन किमान 3500 रूपये विनाकपात पहिला हप्ता देण्याची सर्वच शेतकरी संघटनांची मागणी आहे. पण कारखानदारांना ही मागणी मान्य नसल्यामुळे संघटना आणि कारखानदारांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व शेतकरी संघटना प्रतिनिधी आणि साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची गुरुवारी (2 रोजी) दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बैठक आयोजित केली आहे.
गत हंगामातील 400 आणि चालू हंगामात उसाला चांगला भाव घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने प्रतिटन विनाकपात 3100 रूपयेंचा पहिला हप्ता जाहीर करून कारखाना सुरु केला आहे. पण गतवर्षातील 400 रूपयांसह यंदाच्या हंगामातील योग्य दराचा तोडगा निघण्यापूर्वीच कारखाना सुरु केल्यामुळे बुधवारी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी उसाचे सुमारे 25 ट्रक्टर रोखले. अन्य साखर कारखान्यांनीही दराचा तोडगा निघाल्याशिवाय कारखाने सुरु करू नयेत असे त्यांनी आवाहन केले आहे. त्यामुळे साखर कारखानदारांनीही ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेत कारखाने बंदच ठेवले आहेत. पण यंदाचे पर्जन्यमान आणि धरणांतील उपलब्ध पाणीसाठा पाहता ऊस तोड लवकर होणे गरजेचे आहे. तोडणीला विलंब झाल्यास त्यामध्ये शेतकऱ्यांचाच मोठा तोटा होणार आहे.