रिकामा चंबू घेऊन निदर्शने : केंद्र सरकारवर निशाणा
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक राज्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगदान शून्य आहे. त्यांनी मागील 10 वर्षांत देशातील जनतेला चंबू दिला आहे, असा आरोप करत काँग्रेस नेत्यांनी शनिवारी बेंगळुरात जोरदार निदर्शने केली. काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य सचिव रणदीप सुरजेवाला यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाने पंतप्रधान मोदींच्या बेंगळूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन केले.
बेंगळूरमधील मेख्री सर्कल येथे काँग्रेस नेत्यांनी हाती रिकामा चंबू धरून आंदोलन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना रणदीप सुरजेवाला म्हणाले, केंद्र सरकारने राज्याला दुष्काळ निवारण कामांसाठी 18 हजार कोटी रुपये, 15 व्या वित्त आयोगाकडून 62 हजार कोटी रु. देण्याचे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सांगून हाती रिकामा चंबू दिला आहे. सर्वांच्या बँक खात्यावर 15 लाख रुपये जमा करणार असल्याचे सांगितले, आम्ही कर रुपाने जमा करत असलेल्या प्रत्य्sढक 100 रुपयांपैकी राज्याला केवळ 13 रु. देऊन अन्याय केला आहे. राज्यातून निवडून गेलेल्या भाजप आणि निजदच्या 27 खासदारांनी राज्यासाठी केवळ चंबूच दिला आहे. अशा रितीने केवळ रिकामा चंबू दिलेल्या भाजप पक्षाला या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 6.5 कोटी जनता चंबूच देऊन घरी बसविणार आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
राज्यातील सिंचन, विकास आणि अनुदान देण्याच्या बाबतीत भेदभाव होत असल्याबद्दल आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आधी पंतप्रधानांनी द्यावीत. या निवडणुकीत जनतेने केंद्रातील सत्ताधारी भाजपकडून होत असलेल्या अन्यायाबद्दल निर्णय घ्यावा. भाजपचा पराभव करून महागाई रोखावी, असे आवाहन सुरजेवाला यांनी जनतेला केले.
आमदार रिझवान अर्शद, एआयसीसीचे सचिव अभिषेक दत्त, केपीसीसीचे सचिव विजय मुगुंद, बी. आर. नायडू, केपीसीसीचे उपाध्यक्ष एस. ई. सुधींद्र, कर्नाटक प्रदेश युवा काँग्रेसचे कार्याध्यक्ष एच. एस. मंजुनाथ गौडा आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला.