येळ्ळूर ग्राम पंचायत लक्ष देणार का?
वार्ताहर/येळ्ळूर
येळ्ळूर येथील अरवाळी धरणापासून येणाऱ्या लेंडीनाल्याची रोजगार हमी योजनेंतर्गत खोदाई करण्यात आली. मात्र ही खोदाई गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळच करण्यात आल्याने त्या ठिकाणी दूषित पाणी साचून आहे. ते पाणी त्या विहिरीत जात आहे. यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ग्राम पंचायतीने या प्रकाराकडे लक्ष देवून तातडीने या नाल्याची पूर्ण खोदाई करावी, अशी मागणी होत आहे. येळ्ळूर, धामणे रस्त्यावरील पाटील समाजाची पूर्वीच्या स्मशानभूमीच्या जागेमध्ये ही विहीर आहे. त्या विहिरीला लागूनच रोजगार हमी योजनेंतर्गत खोदाई करण्यात आली. टिळक रोड, सांबरेकर गल्ली, कलमेश्वर गल्ली यासह इतर परिसरातून येणारा नाला या मुख्य नाल्याला जोडला आहे. संपूर्ण दूषित पाणी या नाल्याला येत आहे. त्यामुळे ते दूषित पाणी विहिरीमध्ये मिसळत आहे. तेच पाणी गावाला पुरवठा केला जात आहे. यामुळे साथीचे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. तेंव्हा ग्राम पंचायत या प्रकाराकडे लक्ष देणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. वास्तविक अरवाळी धरणापासूनच या नाल्याची खोदाई करणे गरजेचे आहे. नाल्यावर अतिक्रमण झाले आहे. याचबरोबर या नाल्यामध्ये झाडेझुडपे वाढली असून पाण्याचा निचरा होणे अशक्य झाले आहे. तेंव्हा तातडीने या नाल्याची संपूर्ण खोदाई करावी, अशी मागणी होत आहे. सध्या विहिरीमध्ये जे पाणी साचून आहे ते पाणी निचरा करण्यासाठी तातडीने नाल्याची खोदाई करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ग्राम पंचायतीने ते काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.