रिक्षा असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन
खानापूर : खानापूर शहरात सीएनजी पंप नसल्याने वाहनधारकांची तसेच रिक्षा चालकांची गैरसोय होत आहे. यासाठी खानापूर शहरात लवकरच सीएनजी पंप सुरू करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन रिक्षा संघटनेच्यावतीने शुक्रवार दि. 9 रोजी खानापूर तहसीलदारांना देण्यात आले. उपतहसीलदार कल्लाप्पा कोलकार यांनी निवेदनाचा स्वीकार करून निवेदन जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. खानापूर शहरात मोठ्या प्रमाणात रिक्षा आणि चारचाकी वाहने आहेत. यातील काही वाहने ही सीएनजीवर चालणारी आहेत. मात्र खानापूर शहरात सीएनजी पंप नसल्याने वाहनधारकांची मोठी कुंचबणा होत आहे. सीएनजी भरुन घेण्यासाठी बेळगाव येथील पंपावर रिक्षाचालकांना जावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होत असल्याने सरकारने तातडीने खानापूर शहरासाठी सीएनजी पंप उभारण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, उपाध्यक्ष प्रसाद कोळींद्रेकर, सेक्रेटरी रुद्राप्पा मादार, सदस्य नारायण पाटील, अश्पाक शेख, शंकर पाटील, यल्लाप्पा बुरुड यासह इतर रिक्षा व टॅक्सी संघटनेचे चालक उपस्थित होते.