त्वरित दुरुस्तीची मजगाव ग्रामस्थांची मागणी
मजगाव : महानगरपालिकेतर्फे गेल्या पाच वर्षापूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. त्यावर सिन्टेक्स टँक व बाजुला पाण्याची टाकीही बांधण्यात आली आहे. परंतु अद्याप त्या स्वच्छतागृहाला नळकनेक्शन नाही. त्यामुळे समाजकंटकांनी त्या स्वच्छतागृहातील साहित्याची नासधूस केली आहे. अशा अवस्थेतही नागरिक लघुशंकेसाठी त्या स्वच्छतागृहाचा वापर करत आहेत. त्यामुळे तेथील मंदिर परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. मंदिराला जातेवेळी भाविकांना नाक मुठीत धरून जावे लागते. अद्याप कधीच महानगरपालिकेने त्याची स्वच्छत: केलेली नाही. सोमवार दि. 4 पासून त्याठिकाणी श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे भाविकांना सदर स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्वरित स्वच्छतागृहाची दुरुस्ती करून त्याठिकाणी पाण्याची सोय करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे.