नळांना येत नाही पाणी: टँकरवाले करतात लूटमार : नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
पणजी : पर्वरीत पाण्याचा ठणठणाट झाला असून रहिवाशांना पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे. पर्वरी पाणी प्रकल्प तिळारीचे पाणी बंद झाल्यामुळे ठप्प पडला असून पाण्याविना लोकांचे हाल होत आहेत. टँकरचे पाणी मिळणे देखील मुश्कील बनले आहे. पाण्याअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन खासगी टॅंकरवाले पाण्यासाठी सुमारे रु. 1500 पर्यंतचा दर प्रति टँकरकरीता मागत असून लोकांची पाणी प्रश्नावरून लुटमार सुरू आहे. शिवाय टँकरचे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, याची खात्री कोण देत नाही अशी परिस्थिती आहे. तिळारी धरणाची वार्षिक दुरूस्ती, देखभाल काम सुरू असल्याने तेथील पाणी येणे बंद झाले असून त्यावर चालणारा पर्वरी पाणी प्रकल्प बंद करण्याची पाळी सार्वजनिक बांधकाम खात्यावर आली आहे. त्या प्रकल्पास पर्यायी पाणीपुरवठा करणारी कोणतीच यंत्रणा सरकारने विकसित न केल्याने तो प्रकल्प बंद पडला आहे. त्याचा फटका आता पर्वरी रहिवाशांना बनत असून ते सरकारच्या नावाने बोटे मोडत आहेत. पर्वरी पाणी प्रकल्प 10 ऑक्टोबरपासून बंद असून तो कधी सुरू होईल याची खात्री कोणच देऊ शकत नाही. तरीही आणखी महिनाभर तरी त्रास होईल अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे पर्वरीच्या रहिवाशांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.
अस्नोडातून अपुरा पाणीपुरवठा
अस्नोडा पाणी प्रकल्पातून पर्वरीत काही भागात पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु तो अपुरा असून एका दिवसाआड पाणी पुरवले जाते. ते अनेक भागात पोहोचत नाही. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे एक दिवसाआड पाणी येत नाही अशा लोकांच्या तक्रारी आहेत. बांधकाम खात्याकडेही पुरेसे टँक्टर नाहीत आणि पाणीही नाही अशी ‘आणीबाणी’ निर्माण झाल्याने पर्वरीचे रहिवासी संतापले आहेत. त्यामुळे खासगी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरवाल्यांची चंगळ सुरू आहे.