मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी काळात गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना मारण्याचा कट करण्यात आला. तसेच एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्यासाठी पोलीस एन्काउंटर घडवून आणले जाणार होते असा धक्कादायक आणि खळबऴजनक विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. गायकवाडांच्या या खुलाशाने राजकिय क्षेत्रात एकच खळबळ माजली असून त्यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांच्याकडे बोट केले आहे.
या प्रकरणाचा गौप्यस्फोट करताना शिंदे गटाचे आमदार संजय गाय़कवाड म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना दुसरं काहीही दिलं जाणार नव्हतं, तर त्यांना मृत्यू दिला जाणार होता. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचं एन्काऊंटर केलं जाणार होतं. तसेच मुख्यमंत्र्यांना नक्षलींच्या ताब्यात देऊन हत्या घडवून आणण्याचं त्यांचं स्वप्न धुळीस मिळालं असून मी अत्यंत जबाबदारीने या गोष्टीचा गौप्यस्फोट करत आहे.” असे म्हटले आहे.
या कटाची पार्श्वभुमी सांगताना त्यांनी एका घटनेचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते त्यावेळी त्यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. राज्य सरकारने तत्काळ पावले उचलत एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अंमलबजाणीसाठी तत्कालीन गृहमंत्री शंभुराज देसाई यांच्या घरी बैठक सुरू होती. पण त्याचवेळी ‘मातोश्री’ जे उद्धव ठाकरेंचं निवासस्थान आहे तिथून फोन आला आणि एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, असं सांगण्यात आलं. याचा अर्थ काय? ते एकनाथ शिंदे यांना मारायचे होते. नक्षलवाद्यांच्या हातून मारायचं होतं. त्यामुळेच एकनाथ शिंदें यांना सुरक्षा नाकारली गेली.” असा आरोपही संजय गायकवाड यांनी करून उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष आरोप केला.