राज्यात वाढत्या उन्हाळ्याने साऱ्यांनाच त्रस्त करुन सोडले असून पुढील महिन्यातही उष्णता अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचदरम्यान राज्यात सर्वत्र पाणीटंचाईची समस्या डोके वर काढताना दिसत आहे, ती आणखी वाढेल असा कयास बांधला जात आहे. त्याशी सामना करण्यासाठी राज्य सरकारला सज्ज राहावे लागते आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत विजयासाठी इच्छुकांचे प्रयत्न सुरु झाले आहेत तर दुसरीकडे दहावी बारावी परीक्षा पुढील महिन्यात होणार असून विद्यार्थी तयारीत मग्न झाले आहेत.
कर्नाटकात उन्हाचा तडाखा वाढतो आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात घामोघाम होत आहे तर मार्चमध्ये उष्मा आणखी वाढण्याची शक्यता आहे. गार्डन सिटी बेंगळूरचे तापमान सध्या 37 डिग्रीवर पोहोचले आहे. त्यामुळे साहजिकच राज्यातील अनेक तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे वांदे सुरू झाले आहेत. 782 गावातील 1193 वॉर्डमध्ये पाण्याची समस्या तीव्र आहे. या वॉर्डना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुढील महिन्यात पाणीसमस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता गृहित धरून खासगी कूपनलिका, विहिरीतून पाणीपुरवठा करण्याची तयारी ठेवा, असा आदेश दिला आहे. टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या गावांची संख्या आणखी वाढणार आहे. पावसाअभावी राज्यातील प्रमुख धरणातील पाण्याचा साठाही कमी झाला आहे. जिथे थोडाफार साठा होता तो आटत चालला आहे. पिण्याचे पाणी, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी सरकारला आणखी यंत्रणा राबवावी लागणार आहे.
राज्यसभेच्या चार जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. चार जागांसाठी पाच जण रिंगणात आहेत. काँग्रेसचे अजय माकन, जे. सी. चंद्रशेखर, नासीर हुसेन, भाजपचे नारायणसा भांडगे व निजदचे कुपेंद्र रे•ाr रिंगणात आहेत. विधानसभेतील संख्याबळाच्या आधारावर काँग्रेसला तीन जागांवर विजय मिळवता येतो. भाजपला एक जागा मिळविण्यासाठी आवश्यक संख्याबळ आहे. निजदने कुपेंद्र रे•ाr यांना रिंगणात उतरविल्याने चुरस वाढली आहे. निवडणुकीच्या तोंडावर घोडेबाजाराला ऊत येणार आहे. कारण निजदने काँग्रेस आमदारांशी संपर्क केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. कारण भाजपचा मित्रपक्ष असूनही आपले संख्याबळ टिकवून ठेवण्याचे आव्हान निजदसमोर उभे ठाकले आहे. याबरोबरच काँग्रेसमधील उरलीसुरली मते आपल्या उमेदवारांना वळवण्यासाठी निजद नेत्यांची धडपड सुरू आहे.
एका उमेदवाराच्या विजयासाठी 45.8 मतांची गरज आहे. काँग्रेसने क्रॉस व्होटिंग होऊ नये, याची काळजी घेतली तर सहजपणे तीन जागांवर त्यांना विजय मिळवता येतो. भाजपकडे मात्र 20 अतिरिक्त मते आहेत. किमान 3 अतिरिक्त मते आपल्याच उमेदवारांना घालून उर्वरित 17 मते व निजदचे 19 अपक्ष असे एकूण 37 मतांची जमवाजमव पाचव्या उमेदवारासाठी करण्यात आली आहे. विजयासाठी त्यांना आणखी 9 मतांची गरज आहे. जर राज्यसभा निवडणुकीत पाचवा उमेदवार विजयी झाला तर कर्नाटकातील काँग्रेस सरकारला तो धक्का ठरणार आहे. 3 अपक्षांसह किमान 4 मते मिळविण्याबरोबरच कुपेंद्र रे•ाr यांना कसे विजयी करता येईल? याची तयारी कुमारस्वामी यांनी केली आहे. मात्र, क्रॉस व्होटिंग झाले नाही तर पाचव्या उमेदवाराचा विजय सुलभ असणार नाही. मतदानानंतर निवडणूक एजंटांना मतपत्रिका दाखवायची असते. त्यामुळे काँग्रेसमधील अनेक जण क्रॉस व्होटिंगच्या तयारीत असले तरी त्यांना त्यासाठी धाडस होईना, अशी स्थिती आहे.
या निवडणुकीच्या आधी कर्नाटकातील भाजप-निजद युतीला एक मोठा धक्का बसला आहे. बेंगळूर शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसचे पुट्टण्णा 1 हजार 507 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. भाजप-निजदची युती झाल्यानंतर राज्यात झालेली ही पहिली निवडणूक आहे. निजदशी युती केल्यास काँग्रेसचा वेग रोखता येईल, अशी अटकळ बांधून भाजप नेत्यांनी निजदशी युती केली आहे. मात्र, पहिल्याच प्रयोगात युतीला धक्का बसला आहे. यापूर्वी पुट्टण्णाच बेंगळूर शिक्षक मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य होते. विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी विधान परिषदेला राजीनामा दिला होता. त्यांच्याच राजीनाम्यामुळे ते पद रिक्त झाले होते. आता त्या पदावर पुन्हा त्यांचीच वर्णी लागली आहे. भाजप-निजद युतीचे उमेदवार ए. पी. रंगनाथ यांचा पराभव झाला आहे. आता राज्यसभेच्या निवडणुकीत आपल्या मित्रपक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठी भाजप नेतेही कोणती खेळी करणार? याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यात दहावी-बारावीचे परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले आहे. 1 ते 22 मार्चपर्यंत बारावीची तर 25 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत दहावीची परीक्षा होणार आहे. बारावीसाठी 6 लाख 98 हजार 624 विद्यार्थी परीक्षा लिहिणार आहेत. तर दहावीसाठी 8 लाख 96 हजार 271 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आपली नावे नोंदविली आहेत. 1124 परीक्षा केंद्रांवर बारावीची तर 2747 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा होणार आहे. शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी ही माहिती दिली आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिक्षणमंत्र्यांनी तयारीचा आढावाही घेतला आहे. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेध लागले आहेत. लोकसभेचे निवडणूक वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसले तरी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते लोकसभेच्या तयारीला लागले आहेत.
कोणत्याही परीक्षा म्हटल्या की, त्याचे गैरप्रकार हे ठळक चर्चेत येतात. 545 पोलीस उपनिरीक्षक भरतीसाठी झालेल्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला होता. या गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले निवृत्त न्यायमूर्ती बी. वीराप्पा यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने गैरप्रकार कसा झाला? याचा तपशील मिळविला आहे. सीआयडीच्या स्टाँगरुममध्येच उत्तरपत्रिकेत फेरफार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या बदल्यात उमेदवारांकडून 30 ते 80 लाख रुपयांपर्यंत रक्कम वसूल करण्यात आली आहे. या आयोगाने दिलेला अहवाल विधिमंडळात मांडण्यासाठी सरकारने तयारी चालविली आहे. या परीक्षा गैरप्रकारात अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी अमृत पॉल, पोलीस उपअधीक्षक शांतकुमार यांच्यासह पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे आढळून आले आहे. या परीक्षेतील गैरप्रकारामुळेच पोलीस भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा वारंवार लांबणीवर पडत आहेत. गैरप्रकारांशिवाय परीक्षा घेणे हे सरकारला आव्हानच ठरले आहे. दहावी-बारावीत मात्र नापास होण्याचे प्रमाण घटवण्यासाठी तीन वेळा परीक्षा घेण्यात येणार आहे.