बेळगावात हनीट्रॅप करणारी टोळी कार्यरत : उद्योजक-कारखानदार-धनिकांना अडकवताहेत जाळ्यात
बेळगाव : तंत्रज्ञानाचा विकास जसा होतो आहे, तसे गुन्हेगारीचेही नवनवीन प्रकार सुरू झाले आहेत. बेळगाव शहर व जिल्ह्यात धनिकांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. सध्या बेळगावात एक नवी टोळी धनिकांना लक्ष्य बनवत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या टोळीच्या कारवाया वाढल्या आहेत. बेळगावातील अनेक धनिक, उद्योजक या नव्या टोळीच्या निशाण्यावर आहेत. पोलिसांच्याही डोळ्यात धूळफेक करीत या टोळीच्या कारवाया सुरू आहेत. वेगवेगळ्या प्रकरणात कारावास भोगलेल्या व सध्या जामिनावर असलेल्या काही गुन्हेगारांनी एकत्र येऊन हा प्रकार सुरू केला असून या टोळीत महिलाही आहेत. धनिकांना धमकावून लाखो रुपये उकळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
यापूर्वी नागमणी, गजमणी, राईस पुलरच्या नावे फसवणुकीचे प्रकार घडायचे. अशा प्रकरणात सावजाबरोबर आर्थिक व्यवहार करताना गुन्हेगारातील काही जण पोलिसांच्या पोषाखात येऊन छापा टाकायचे. पोलिसांना घाबरून सगळेच तेथून पलायन करायचे. आता असाच प्रकार हनीट्रॅपसाठीही केला जात आहे. गुन्हेगारांमध्येच काही पोलीस अधिकारी तयार झाले आहेत. अंगावर खाकी कपडे चढवून धनिकांना धमकावण्यात येत आहे. आपल्या निशाण्यावर असलेल्या धनिकांना टोळीतील महिला मेसेज करतात. आपण अडचणीत आहोत. घर चालविण्यासाठी नोकरीची गरज आहे. आपल्याला काही तरी नोकरी द्या, असे सांगत गयावया करतात. त्यांच्यावर दया दाखवून एखादी नोकरी दिल्यानंतर त्यांचे मेसेज सुरू होतात. काही तरी निमित्ताने भेटण्यासाठी बोलावतात किंवा सावज असेल तेथेच या ललना पोहोचतात. सावजाला बोलत ठेवून आपल्या सहकाऱ्यांना बोलावून घेतात. यांनी आपला दुरुपयोग केला, असे सांगत रडारड सुरू होते. याच वेळेला ठरल्याप्रमाणे काही गावगुंडही तेथे जमा होतात. बोगस महिला पोलीस अधिकारीही दाखल होतात. साहेब तुमची चूक आहे, एका गरीब आणि गरजू तरुणीला नोकरीच्या आमिषाने गैरफायदा घेतला, असा आरोप केला जातो.
बेअब्रू होण्याच्या भीतीने खंडणी
प्रत्यक्ष व्यवहाराला सुरुवात होते. बेअब्रू होण्याच्या भीतीने अनेक जण या टोळीतील गुन्हेगारांना खंडणी देऊन स्वत:ची सुटका करून घेत आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका खळबळजनक खून प्रकरणात जामिनावर असलेले गुन्हेगार या प्रकारात गुंतल्याची माहिती मिळाली असून एका पाठोपाठ एक सावजांना ठकवण्यात येत आहे. रियल इस्टेट व्यावसायिक, कारखानदार, उद्योजक या टोळीच्या हिटलिस्टवर असून टोळीतील तरुणी त्यांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांना मेसेज करत असतात. एखादे सावज आयते जाळ्यात अडकले, की संपूर्ण टोळीच त्याच्या घरात घुसून त्याला धमकावते व त्याची आर्थिक लूट करते. या टोळीची प्रमुख असलेल्या एका महिलेने खून प्रकरणातील गुन्हेगारांना आशेचा किरण दाखवत लुटमार सुरू केली आहे.
आठ दिवसांपूर्वीच सावजाला लुटले
खून प्रकरणात कारागृहात पोहोचल्यानंतर तेथील गुन्हेगारांशी झालेली मैत्री, जामिनावर सुटका झाल्यानंतरही कायम ठेवून त्यांनी हा उद्योग सुरू केला आहे. या टोळीने आठ दिवसांपूर्वीच एका सावजाला गाठून लुटल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही भल्या भल्या उद्योजकांना उचलून त्यांच्याकडून खंडणी वसूल केली आहे. आमचे कोणी काहीच वाकडे करू शकत नाही. अशा थाटात या टोळीतील गुन्हेगारांचे वागणे आहे.