ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackreay) यांची रविवारी औरंगाबादेत सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सुरू झालेला जातीय द्वेष, मशिदींवरील भोंगे आणि इतर काही मुद्यांवर भाष्य केले. या सभेनंतर राज ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनीही ट्विट करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “देव कणाकणात आहे, त्याची चर्चा सोडा! लोकशाहीच्या मंदिरातील जनता जनार्दन नावाच्या देवाची चिंता करा! ह्या देवाचा श्वास कोंडला आहे परिस्थीमुळे, महागाईचा डोंगर त्या देवावर कोसळला आहे.”
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यास उद्यापर्यंत म्हणजेच तीन मे ची मुदत दिली आहे. भोंगे काढले नाही तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केले आहे. दरम्यान, राज्यात भोंगे काढणे हा महत्त्वाचा विषय नाही. महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असून, त्यावर कोण बोलत नाही. सर्वसामान्य जनतेला भेडसावणारे प्रश्न बाजूला राहतात. देवळातील देवाची चर्चा सोडा आता लोकशाहीच्या मंदिरातील जनता जनार्दनाचाच श्वास कोंडला आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.