बिहारमध्ये 3500 किमीची पदयात्रा
वृत्तसंस्था/ हाजीपूर
बिहारमध्ये नवा राजकीय पर्याय देण्याच्या प्रयत्नाअंतर्गत निवडणूक व्यूहनीतिकार प्रशांत किशोर यांनी चंपारण्ये येथून रविवारी पदयात्रेस प्रारंभ केला आहे. गांधी जयंतीवेळी गांधींच्या चंपारण्य यात्रेच्या मार्गातूनच मोहिमेला प्रारंभ केला असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. पाटण्याहून हाजीपूर येथे प्रशांत किशोर यांचा ताफा पोहोचताच समर्थकांनी जोरदार स्वागत केले आहे.
हाजीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या स्वागतार्थ जनसुराजशी निगडित कार्यकर्त्यांनी पुष्पवर्षाव केला आहे. माझ्यामध्ये बिहारचा दुसरा गांधी होण्याची कुठलीच महत्त्वाकांक्षा नाही, मी तर केवळ गांधींचा एक छोटा अनुयायी असल्याचे उद्गार प्रशांत किशोर यांनी यावेळी काढले आहेत.
प्रशांत किशोर मागील काही काळापासून अत्यंत आक्रमक रणनीतिच्या अंतर्गत बिहारच्या राजकारणात नवा पर्याय निर्माण करू पाहत आहेत. गांधी जयंतीदिनी त्यांनी चंपारण्यमधून पदयात्रेस प्रारंभ केला आहे. ही पदयात्रा अनेक महिन्यांपर्यंत बिहारच्या विविध जिल्हय़ांमधून जात पूर्ण होणार आहे.
प्रशांत किशोर यांनी ‘जन सुराज’ यात्रेस पश्चिम चंपारण्यच्या गांधी आश्रमातून सुरू केली आहे. ही यात्रा पुढील दीड वर्षांमध्ये बिहारच्या कानाकोपऱयात पोहोचणार आहे. ही पदयात्रा 3500 किलोमीटर लांबीची असणार आहे. प्रशांत किशोर हे बिहारच्या गावागावत जात लोकांच्या समस्या ऐकणार आहेत.
ही पदयात्रा 12-15 महिन्यापर्यंत चालणार आहे. जनसंवादाद्वारे पलायन, बेरोजगारी, कृषी, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या मुद्दय़ांवर पुढील 15 वर्षांसाठी ग्रामपंचायत स्तरावर बिहारच्या विकासाचे व्हिजन डॉक्यूमेंट तयार करण्याचा उद्देश आहे. पदयात्रेनंतर अधिवेशन आयोजित केले जाणार असून त्यात राजकीय पक्ष स्थापण्यासंबंधीचा निर्णय घेतला जाणार आहे.