संग्राम कदम / आळसंद
खानापूर तालुक्यातील कमळापूर-आळसंद गावच्या शिवारात गेल्या आठ दिवसापासून एक बिबट्या आपल्या पिलासह वावरताना दिसतो आहे. त्यामुळे ग्रामस्थ अक्षरशः हादरून गेले आहेत. भीतीमुळे लोक घरातून बाहेर पडेनासे झाले आहेत. ऊस तोडणी सुद्धा बंद आहे. मात्र रोज दर्शन देणारा बिबट्या पकडण्यात वन विभाग पूर्णतः अपयशी ठरल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.
आठ दिवसांपूर्वी नागरिकांना बिबट्याचे आणि त्याच्या पिलाचे दर्शन झाले. वन्य जीवाचे रक्षण होण्याबरोबरच ग्रामस्थांनाही या भयापासून मुक्त करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. गेल्या आठ दिवसापासून कमळापूर-आळसंद आणि परिसरात बिबट्या फिरतो आहे. त्याची खात्री वन विभागाने केलेली आहे. त्याला पकडून सुरक्षित जंगलात सोडण्याची आवश्यकता आहे. मात्र वन विभागाचे लोक दिवसातून दोन वेळा गावात घिरट्या घालण्याशिवाय अन्य काहीही हालचाल करत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थातून संतापाची भावना निर्माण झाली आहे.
वन विभागाचे अधिकारी येतात, लोकांना बिबट्यापासून जपून राहण्याचे सावधानतेचे इशारे देतात. घरातून बाहेर पडू नका, शेतात जाऊ नका, ऊसतोड करू नका असे सांगतात आणि निघून जातात. असे वारंवार होऊ लागल्याने ग्रामस्थ आता त्यांना प्रश्न विचारू लागले आहेत. त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना न करता सांगलीतून,कोल्हापुरातून, रत्नागिरीतून, मुंबईतून पथक येणार आहे आणि ते पथक बिबट्याला जेरबंद करून घेऊन जाईल असे त्यांच्याकडून रोज एका गावाच्या नावाचे पथक जाहीर केले जाते मात्र ते काही केल्या येत नाही. त्यामुळे वन विभाग बिबट्या स्वतःहून या शिवारातून दुसऱ्या शिवारात जाण्याची वाट पाहतो आहे की आपला तालुका सोडून दुसऱ्या तालुक्याच्या हद्दीत जावे याच्या प्रतीक्षेत आहे? असा प्रश्न आता लोक करू लागले आहेत. सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील भागांमध्ये अशाप्रकारे ऊस शेतीमध्ये वारंवार बिबट्याचे दर्शन होणे धोकादायक आहे. बिबट्याने जंगल सोडण्याची कारणे शोधून त्यांची जंगलात चांगली सोय करण्याची आवश्यकता असताना वन विभाग बिबट्यांचे पैदास शेतांमध्ये व्हावी याची वाट पाहत आहे का? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थ करू लागले आहेत. वन विभागाच्या जिल्ह्यातील आणि राज्यातील यंत्रणेने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि तालुक्याच्या आमदारांनी याबाबतीत वन विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन बिबट्याला जेरबंद करावे आणि त्याच्या सुरक्षित अधिवासात रवाना करावे अशी ग्रामस्थातून मागणी होत आहे. वनविभागाच्या गाड्या येतील आणि ते बिबट्याला पकडून येतील या भरोशावर अजून किती काळ काम ठप्प करायचे, जगण्यासाठी तरी बाहेर पडायचे का नाही? असा लोकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकांचा अंत न पाहता तातडीने यावर उपाय करावेत अशी मागणी होत आहे.
अन्न टंचाईमुळे बिबट्यांनी जंगल सोडले?
अलीकडच्या काळात जंगलामध्ये पुरेसे अन्न मिळत नसल्याने बिबट्याने ऊस शेतीत आसरा घेण्यास सुरुवात केली आहे अशी चर्चा आहे. शिराळा किंवा कराड भागातील जंगलातून हे बिबटे जवळपासच्या सर्व तालुक्यातील शिवारांमध्ये शिरले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जंगलांमध्ये उन्हाच्या तीव्र झळा आणि पुरेसे अन्न उपलब्ध नसल्याने गारवा असलेल्या आणि सहज शिकार उपलब्ध होणाऱ्या भागात बिबट्याने वास्तव्य केल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सांगली जिल्ह्यातील अनेक उसाच्या मळ्यांमध्ये असे बिबटे आणि त्यांची पिल्ले आढळले आहेत. काही ठिकाणी उसाचे पाचट पेटवल्यानंतर पिलांचा होरपळून मृत्यूही झाला आहे. तर अनेकदा महामार्ग ओलांडून जात असताना बिबट्यांचा अपघात होऊन मृत्यू होतो. भरता वाहने त्याला ठोकरुन जातात. मात्र या प्रकरणी वन विभागाचे अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? बिबट्यांना जंगलात सोडावे वाटते यातला कोणी गांभीर्याने का घेत नाही? असा प्रश्न कमळापूर आळसंद आणि परिसरातील ग्रामस्थातून विचारला जाऊ लागला आहे.