मुंबई / ऑनलाईन टीम
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्या दि. 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजलेपासून राज्यात 15 दिवस कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यामुळे 1 मेपर्यंत राज्यात संचारबंदी असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी वाढत्या कोरोना फैलावामुळे नाईलाजाने संचारबंदी करावी लागत आहे. जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केले.
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत होती. त्यामुळे पूर्वीच विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. तसेच पूर्ण लॉकडाऊनबाबतही चर्चा सुरू होती. अखेर आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्यापासून संचारबंदी लागू करत असल्याचे जाहीर केले. संचारबंदी असली तर अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार आहेत. मात्र, इतर सेवा बंद राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहणार आहे. लोकल, बस सुरू राहतील. पण त्या अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देणाऱ्या वर्गाला येण्या-जाण्यासाठी चालू राहतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हा स्तरावर आरोग्य सुविधा उभी करण्यासाठी 3 हजार 300 कोटी फक्त कोविडसाठी बाजूला काढून ठेवले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना थेट स्थानिक पातळीवर निर्णय घेता यावा, यासाठी हे करण्यात आले आहे. साधारणपणे एकूण ४०० कोटींच्या योजना आपण या माध्यमातून करत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
काय सुरू ?
सार्वजनिक वाहतूक सेवा
अत्यावश्यक सेवा
रेल्वे, लोकल, बस सेवा
खत दुकाने, शीतगृहे, शेतीकामे
औद्योगिक क्षेत्रातील उद्योगधंदे
पार्सल सेवा
पेट्रोल पंप, दूरसंचार, बँक,
मेडिकल, किराणा दुकाने
बंद काय ?
हॉटेल, रेस्टॉरंट, बार
अनावश्यक फिरता येणार नाही
इतर सेवा, चित्रपटगृहे, शूटिंग
एक महिना मोफत मिळणार
शिवभोजन थाळी
फेरीवाले, रिक्षावाले, बांधकाम कामगारांनाही अर्थसहाय्य
परवानाधारक फेरीवाले, रिक्षावाले, बांधकाम कामगारांना पंधराशे रुपये मिळणार
7 कोटी लोकांना 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ