अजित दादांच्या वक्तव्याचा आम्ही आदर करतो पण सातारच्या जागा शरद पवार गटाकडे आहेत त्यामुळे त्याच्या वाटपासंबंधीचा निर्णय वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात येईल असा अप्रत्यक्ष इशारा राज्याचे गृह राज्य़मंत्री शंभुराज देसाई यांनी अजित पवार गटाला दिला आहे. त्यामुळे येत्या काळात महायुतीचा जागावाटपावरून राजकिय वातावरण तापण्याची शक्यता दिसून येत आहे. ते आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्य़मांशी संवाद साधला.
कालच अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या कर्जत येथिल चिंतन शिबिरात येत्या लोकसभा निवडणुकीत बारामती, सातारा, शिरूर या जागा लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सातारचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दादांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देऊन भाष्य केले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “महायुतीमध्ये राष्ट्रवादी आत्ताच सहभागी झाला आहे. अजितदादांच्या वक्तव्याचा आम्ही आदर करतो. पण त्यांनी ज्या जागा मागितल्या आहेत त्या शरद पवार गटाकडे आहेत. त्यामुळे या जागावरील निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल.” असे ते म्हणाले.
धनगर आरक्षमावर बोलताना त्यांनी, “येत्या हिवाळी अधिवेशनात सरकार मराठा समाजासह धनगर आणि इतर आरक्षणावर सकारात्मक चर्चा करेल. कोणाचं तरी काढून कोणालातरी दिले जाईल असा एक गैरसमज सध्या पसरवला जात आहे. कोणाचाही काढून न घेता आणि कायदेशीर दृष्ट्या टिकणारी आरक्षण हे सरकार देणार आहे.” असाही खुलासा त्यांनी केला.
मनोज जरांगे- पाटिल यांना संयम बाळगण्याचा सल्ला देताना मंत्री देसाई म्हणाले, “आंदोलनात दगडफेक, जाळपोळ,पोलिसांवर हल्ले झाले तर वेगवेगळ्या नियमानुसार कारवाई होत असते. सरकार जाणीवपूर्वक कठोरपणे कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शब्दावर त्यांचा विश्वास आहे हे मनोज जरांगे पाटील यांनीही सांगितलं आहे. त्यामुळे जरांगे पाटलांना विनंती आहे त्यांनी संयम पाळावा.” असे आवाहन त्यांनी केले.