पंजाबमधील खासदार भाजपच्या संपर्कात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस खासदार राहुल गांधी एकीकडे भारत जोडो न्याय यात्रा करत असताना दुसरीकडे पक्षातील मातब्बर नेत्यांचा पक्षावरील विश्वास उडाला आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याबद्दल चर्चा सुरू असताना आता माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी हे काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा आहे.
मनीष तिवारी हे सातत्याने भाजपच्या संपर्कात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तिवारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर काँग्रेसला मोठा झटका बसू शकतो. तिवारी हे काँग्रेसचे पंजाबमधील निष्ठावंत नेते मानले जातात. तसेच ते स्वच्छ प्रतिमेचे आणि राजकीय दृष्ट्या प्रगल्भ नेते म्हणूनही ओळखले जातात.
अलिकडेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आणखी अनेक काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. विविध राज्यांमधील या दिग्ग्ज नेत्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला तर काँग्रेसच्या निवडणूक मोहिमेला धक्का बसणार हे निश्चित.
पंजाबच्या आनंदपूर साहिबचे खासदार मनीष तिवारी हे मागील काही काळापासून पक्षात एकाकी पडले होते. तिवारी हे संपुआ सरकारमध्ये 2012-14 दरम्यान माहिती-प्रसारण मंत्री होते. काँग्रेसचे प्रवक्ते म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तिवारी हे भाजपच्या उमेदवारीवर लुधियाना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे.