म्हासुर्ली / वार्ताहर :
मामाकडे सुट्टीसाठी आलेल्या तेरा वर्षीय भाच्याचा नदीत पोहण्यासाठी गेला असता पाण्यात बुडून मृत्यू झाला. धामणी खोऱ्यातील वेतवडे (ता.पन्हाळा) येथे ही घटना घडली असून गावासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेरिवडे (ता.गगनबावडा ) हे मुळ गाव पण सध्या राहणार पुणे येथील आदित्य शिवाजी पाटील (वय १३) हा मुलगा वेतवडे ता.पन्हाळा येथील आपल्या मामाकडे उन्हाळी सुट्टीनिमित्त राहायला आला होता. शुक्रवार दि २६ रोजी दुपारी तीन ते चार वाजताच्या दरम्यान तो वेतवडे येथील धामणी नदीतील पाणवठ्यावर आंघोळीसाठी गेला. पण पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना चार वाजता घडली होती. पण सायंकाळ होऊनही तो गावात न आल्याने सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. पाणवठ्यावर जनावरांना घेऊन गेलेल्या गावातीलच एका व्यक्तीला नदीकाठी चप्पल व कपडे काढलेले दिसल्याने मुलगा पाण्यातच असणार असा अंदाज लावून गावातील तरुणांनी एकत्र येत पाण्यात उतरून रात्री साडेसात वाजता मृतदेह शोधून काढला.
त्यानंतर कळे पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर कोल्हापूर येथे पाठविण्यात आला. याबाबतची वर्दी युवराज लक्ष्मण पाटील (मामा) रा.वेतवडे ता.पन्हाळा यांनी कळे पोलीस ठाण्यात दिली असून, पुढील तपास सपोनि प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ शंकर पाटील करत आहेत.