मुंबई : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरुन वादंग निर्माण करत संविधानिक संस्था, पदांविषयी अविश्वास निर्माण करून शहरी नक्षलवाद्यांच्या कुटनीतीचा वापर करणारे खा. संजय राऊत देशद्रोह करत आहेत, अशी घणाघाती टीका भाजपा आ. नितेश राणे यांनी बुधवारी केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नितेश राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा जगभरात गौरव होत आहे. मोदी आणि भारताचा सन्मान होत असल्याचे खा. राऊत यांना पाहवत नाही. म्हणून असुयेपोटी नव्या संसद भवनाची गरज नाही, राष्ट्रपतींचा अवमान केला जातो अशी फुटकळ चर्चा घडवली जाते. सुमित्रा महाजन लोकसभेच्या अध्यक्ष असताना सर्वानुमते नव्या संसद भवन उभारणीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळची शिवसेना एनडीएचा घटक पक्ष होता. तो निर्णय खा. राऊत यांच्यासारख्याना चुकीचा वाटू लागतो हे अनाकलनीय आहे. नव्या संसद भवनाच्या उभारणीवर टीका करणाऱया राऊतांनी उद्धव ठाकरेंना नव्या मातोश्री बांधणीची काय गरज भासली, असं विचारलं होत का, असा सवालही आ. राणे यांनी केला.
जयंत पाटील व अजित पवार यांच्यात भांडणं लावून राष्ट्रवादी फोडण्याचा खा. राऊत यांचा डाव आहे. जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ सामनाचा अग्रलेख लिहीला जातो. मात्र अजित पवारांच्या समर्थनात साधा लेखही लिहीला जात नाही. उलट त्यांच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध केल्या जातात, असेही राणे यांनी नमूद केले.