महाराष्ट्र काँग्रेसने माजी आमदार आशिष देशमुख यांची पक्षनेतृत्वाविरोधात जाहीर वक्तव्ये केल्याप्रकरणी सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. देशमुख यांच्या हकालपट्टीचे आदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जारी केले आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिस्तपालन समितीचे अध्यक्ष आहेत.
आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील वक्तव्य केले होते. त्यामुळे गेले काही दिवस अशिष देशमुख यांच्यावर कॉंग्रेस नेत्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या ‘मोदी आडनाव’ वक्तव्याबद्दल मागासवर्गीय (ओबीसी) समुदायाची माफी मागावी, असे देशमुख म्हटले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पक्षात हुकुमशाही करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
देशमुख यांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसीला आलेल्या उत्तरावर समितीने चर्चा केली असल्याचे शिस्तपालन समितीने म्हटले आहे. ”आम्हाला तुमच्या पक्षाविरुद्धच्या जाहीर वक्तव्यांचे उत्तर असमाधानकारक आढळले. तुमची पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांसाठी तत्काळ प्रभावाने हकालपट्टी करण्यात येत आहे,” असे पत्रात अशिष देशमुखांना उद्देशुन म्हटले आहे.
नागपुरातील काटोल या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडूण आलेले अशिष देशमुख यांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नागपूर दक्षिण- पश्चिम मतदारसंघातून भाजप नेते आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. अशिष देशमुख यांचे वडिल रणजित देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष होत.