ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल यांच्यात लढत होणार आहे. या निवडणुकीत आता नवा ट्विस्ट आला आहे. ठाकरे गटाने भाजप उमेदवार मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर पाच आक्षेप घेतले आहेत. तसेच यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र पाठवून त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीला अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाने सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सावध पवित्रा घेत ऋतुजा लटके यांच्यासोबतच संदीप नाईक यांचाही उमेदवारी अर्ज दाखल आहे. पण भाजपच्या एकाच उमेदवाराने अर्ज भरला आहे. त्याच्याविरोधात आता ठाकरे गटाने आक्षेप नोंदवला आहे.
अधिक वाचा : बोगस शपथपत्राप्रकरणी ठाकरेंना दिलासा; क्राईम ब्रँचने केला महत्वाचा खुलासा
मुरजी पटेल यांना 2017 पासून सहा वर्षांची निवडणूक लढण्यास बंदी असताना त्यांनी उमेदवारी अर्ज कसा दाखल केला.?, निवडणूक लढण्याच्या परवानगीबाबत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असतानाही उमेदवारी अर्ज का दाखल केला?, या दोन्ही प्रकाराची माहिती प्रतिज्ञापत्रात देणे बंधनकारक असताना ती लपवण्यात आली. निवडणूक लढण्यास बंदी असल्याने, त्यांचा मतदान करण्याचा अधिकार काढून घ्यावा, असा आक्षेप घेत ठाकरे गटाने पटेल यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी केली आहे.