जळगाव / प्रतिनिधी :
राज्य शासनाने शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राज्य शासनाने सुरू केला असून या उपक्रमांतर्गत 27 जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावला येत आहेत. कार्यक्रम भव्य व्हावा या दृष्टीने युध्दपातळीवर नियोजन सुरू असून या दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासनातील 27 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या जोडीला 60 उप नोडल अधिकारी देखील सहकार्यासाठी देण्यात आले आहेत.
शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य काही मंत्री 27 जून रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राज्यातला सर्वात मोठा कार्यक्रम ठरावा यासाठी राजकीय स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत तर प्रशासन पातळीवर या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर येथील नियोजन भवनात पूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी 35 हजार लाभार्थी जमवण्याचे उदीष्ट देण्यात आले आहे. लाभार्थींना जिल्हाभरातून आणण्यासाठी 200 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या दौऱ्याच्या तयारीचा आढावा एका बैठकीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी घेतला.
यावेळी बोलताना पाटील यांनी त्या-त्या विभागाचे अधिकारी यांनी दिलेल्या जबाबदारीनुसार नियोजन करावे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांसाठी पार्किंग, भोजन व पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था ठेवावी. दिव्यांग लाभार्थ्यांची स्वतंत्र्य व्यवस्था करावी. आरोग्यसुविधा उपलब्ध ठेवावी. तसेच जास्तीत जास्त लाभार्थी उपस्थित राहण्यासाठी व्यापक प्रचार व प्रसिद्धी करत, सूक्ष्म नियोजन करून शासन आपल्या दारी हा उपक्रम 100 टक्के यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या बैठकीत केले.