केजरीवालांची नवी शक्कल : ईडीचा कोर्टात दावा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान ईडीने राऊस एव्हेन्यू न्यायालयात सनसनाटी दावा केला आहे. केजरीवाल आपल्या घरातून जाणूनबुजून गोड पदार्थ मागवत असून आंबे, मिठाई यांचे अधिक सेवन करत असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. गोड पदार्थ जास्त खाल्ल्यास त्यांची साखरेची पातळी वाढून आरोग्याच्या समस्या निर्माण होतील अशी आशा त्यांना असून जामीन मिळवण्यासाठी त्यांच्याकडून ही शक्कल लढवली जात असल्याचे म्हणणे ईडीच्या वतीने वकील जुहैब हुसैन यांनी न्यायालयात मांडले. अरविंद केजरीवाल यांच्या घरातून जाणूनबुजून गोड पदार्थ येत असल्यामुळे त्यांची साखरेची पातळी वाढते. त्यांना मुद्दाम घरातून बटाटे, पुरी, आंबे, मिठाई आणि इतर गोड पदार्थ दिले जात आहेत. अशा स्थितीत साखरेची पातळी वाढून त्यांना वैद्यकीय आधारावर जामीन मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र, आता न्यायालयाने या दाव्याबाबत तुऊंग प्राधिकरणाकडून अहवाल मागवण्यात आला आहे. केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी ईडीच्या वकिलाच्या युक्तिवादाला विरोध करत हे विधान मीडियासाठी दिले जात असल्याचे सांगितले. तसेच त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसारच जेवणातील पदार्थ दिले जात असल्याचे सांगितले. तथापि, आम्ही तुऊंगातून अहवाल मागवू, असे न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांना सांगितले. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 19 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या साखरेची नियमित चाचणी करण्याची मागणी करणारी याचिका राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात दाखल करण्यात आली. यासंबंधी सध्या सुनावणी सुरू आहे.