रमाकांत खलप यांचा सुदिन ढवळीकर यांच्यावर निशाणा
पणजी : गोवा राज्य विद्युत खात्याचे लाइनमन मनोज जांबावलीकर यांचा कर्तव्य बजावताना विजेचा धक्का लागून झालेला दुर्दैवी मृत्यू हा खात्याच्या निक्रीयतेचा भाग आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार अॅड. रमाकांत खलप यांनी केली आहे. लाईनमन जांबावलीकर यांच्या मृत्यूची बातमी ऐकून धक्का बसला. 2019 ते 2024 या काळात जवळपास 71 व्यक्ती आणि 30 प्राण्यांना विजेचा धक्का बसून ते दगावले आहेत. वीज यंत्रणा अद्यावत करण्यासाठी तब्बल 12 हजार कोटी खर्च करूनही जर जीवितहानी होत असेल तर हे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे अपयश आहे म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, असे खलप म्हणाले. गोव्यात वीज पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडल्या आहेत. उद्योगपती, व्यापारी आस्थापने आणि सरकारी विभाग यांच्याकडून अनेक कोटी ऊपयांची थकीत वीज बिले वसूल करण्यात सरकार सरकार दुर्लक्ष करीत आहे. परंतु जर दोन महिन्यांसाठी वीज बिल भरणा देय रक्कम गरीब लोकांकडून मिळण्यास उशीर होत असेल तर त्यांच्याकडे बिल भरण्याचा तगादा लावला जातो किंवा त्यांचे घरगुती वीज कनेक्शन तोडण्यास मागेपुढे पाहिले जात नाही, असा आरोपही खलप यांनी केला.