डाळींच्या भाववाढीबाबत केंद्र सरकारचा इशारा
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या दीड महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी डाळींच्या किमतीत वाढ झाल्याने सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. डाळीच्या किंमती वाढत चालल्यामुळे सरकारने डाळीशी संबंधित उद्योगातील भागधारकांसोबत नुकतीच एक बैठक घेतली. ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सरकारने डाळींच्या साठेबाजीवर चिंता करत व्यापाऱ्यांना नफेखोरी करू नये असा सल्ला दिला. तसेच साठेबाजी करून दर वाढविण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला.
ग्राहक व्यवहार सचिवांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत देशात उपलब्ध असलेल्या डाळींच्या साठ्याचा आढावा घेण्यात आला. आयात केलेली डाळ बाजारात येत नसल्याने भाव वाढत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. ग्राहक व्यवहार सचिवांनी व्यापाऱ्यांना ग्राहकांना वाजवी दरात डाळ उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. या बैठकीत डाळींच्या आयातदारांचाही समावेश होता. ग्राहक व्यवहार सचिवांनी व्यापाऱ्यांना किरकोळ बाजारात किंमती वाढणार नाहीत याची काळजी घेण्यास सांगितले आहे. डाळींचा साठा केला जात असल्यामुळे भाव वाढतील. सरकार नफेखोरी अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा सरकारने व्यापाऱ्यांना दिला म्हणाले.
ज्या देशांतून डाळी भारतात आयात केल्या जातात त्या देशांमध्ये डाळींचा साठा केला जात आहे. त्यामुळे डाळींची आयात महाग होत आहे. मोझांबिकमधील दोन व्यापाऱ्यांमधील वादामुळे डाळीच्या आयातीवर परिणाम झाल्याचे बैठकीत आयातदारांनी सरकारला सांगितले. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हे प्रकरण संबंधित देशांसमोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे.