तातडीने गुंतवणूक परत मिळावी
बेळगाव : संगोळ्ळी रायण्णा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी, क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा सौहार्द लि., गजराज मल्टिपर्पज सोसायटी, भिमांबिका को-ऑप. सोसायटी या सोसायटीचे चेअरमन आनंद अप्पुगोळ यांनी सोसायटी बंद करून ठेवीदारांची फसवणूक केली आहे. याबाबत न्यायालयातून ठेवीदारांना ठेवी परत देण्याचा आदेश दिला आहे. मात्र, शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे ठेवीदारांच्यासमोर अडचणी वाढू लागल्या आहेत. शासनाने ठेवीदारांच्या ठेवी तातडीने द्याव्यात, अशी मागणी एसआरएस ठेवीदार असोसिएशनने गुरुवारी विधानसौध परिसरात आंदोलनाद्वारे केली आहे. गुंतवणूकदारांनी ठेवी परत मिळाव्यात यासाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे. न्यायालयाने सोसायटीची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांची रक्कम द्यावी, असा आदेश दिला आहे. मात्र, शासनाकडून याबाबत कोणताच प्रयत्न होताना दिसत नाही. या चार सोसायट्यांमध्ये 300 कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा झाला आहे. यामध्ये 25 हजारहून अधिक ठेवीदार आहेत. यामध्ये महिला आणि वृद्ध ठेवीदारांची संख्याही मोठी आहे. दरम्यान, गुंतवणूकदारांना क्लेम फॉर्मसाठी बेंगळूरला जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र, ठेवीदार महिला आणि वृद्ध असल्याने बेळगावातच क्लेम फॉर्म उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही केली आहे. ठेवीदारांची रक्कम परत करण्यासाठी 10 हजार ठेवीदारांकडे ऑर्डर कॉपी आली आहे. मात्र, पाच वर्षांपासून सातत्याने याकडे दुर्लक्ष होत आहे. अद्याप ठेवीदारांना एक रुपयाही परत मिळालेला नाही. त्यामुळे शासनाने ठेवीदारांची रक्कम परत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही ठेवीदार असोसिएशनने केली आहे.