बीसीसीआयने द्रविड यांच्यासह संपूर्ण स्टाफची कराराची मुदत वाढवली :
वृत्तसंस्था/ मुंबई
आयसीसी वनडे विश्चषकच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्तसमोर आले होते. तसेच ते आयपीएलच्या काही संघांच्या संपर्कात असल्याचे देखील बोलले जात होते. मात्र या सर्व गोष्टींना पूर्णविराम मिळाला असून बीसीसीआयने त्यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून मुदतवाढ दिली आहे. द्रविड यांच्यासह फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाब्रे व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप हे देखील संघासोबत कायम राहतील. दरम्यान, बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ किती दिवसांसाठी वाढवला याची माहिती दिलेली नाही.
द्रविड यांनी गेली 20 वर्ष भारतीय क्रिकेट संघासोबत एक खेळाडू, कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून प्रवास केला. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2022 टी 20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती. त्याशिवाय आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता तर यंदाच्या वनडे विश्वचषकाची फायनलही गाठली होती. वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने सलग दहा विजय मिळवले होते. मात्र, अंतिम सामना संघाने गमावला. दरम्यान, विश्वचषकापूर्वीच द्रविड यांनी आपण यानंतर भारतीय संघासोबत नसेल असे संकेत दिले होते. त्यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण हे मुख्य प्रशिक्षक होतील, याबाबतची जोरदार चर्चा होती. मात्र, संघाच्या एकूण कामगिरीचा विचार करता बीसीसीआयने द्रविड यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. तसेच व्हीव्हीएस लक्ष्मण एनसीए प्रमुख म्हणूनच काम पाहणार आहे. याशिवाय, द्रविडच्या अनुपस्थितीत लक्ष्मण भारतीय संघाला धडे देणार आहे.
वर्ल्डकपनंतर नवी आव्हाने
नुकत्याच संपलेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर बीसीसीआयने राहुल द्रविड यांच्याशी अर्थपूर्ण चर्चा केली आणि सर्वांच्या संमतीने त्यांच्या कोचपदाचा करार वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी द्रविडचा हेड कोच पदाचा करार 2 वर्षांसाठी होता. 2023 च्या वनडे विश्वचषकानंतर हा करार संपला. आता हा करार नव्याने सुरू झाला असल्याचे बीसीसीआयने पत्रक जारी केले आहे.
टीम इंडियासोबतची गेली दोन वर्षे अविस्मरणीय अशी राहिली आहेत. आम्ही एकत्रपणे चढ उतार पाहिले आणि या संपूर्ण प्रवासात संघातील पाठिंबा आणि विश्वास कायम राहिला, ही उल्लेखनीय बाब आहे. आम्ही ड्रेसिंग रुममध्ये निर्माण केलेले वातावरण आणि संस्कृतीचा मला अभिमान आहे. संघाकडे जे कौशल्य आणि प्रतिभा होती त्यावर आम्ही भर दिला. प्रोसेसवर फोकस केला आणि तयारीवर भर दिला. यामुळे निकालावर त्याचा परिणाम झाला. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, पाठिंबा दिल्याबद्दल, मी बीसीसीआय आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. या भूमिकेत राहण्यासाठी बराच वेळ घरापासून दूर राहणे आवश्यक आहे आणि मी माझ्या कुटुंबाच्या त्याग आणि समर्थनाचे मनापासून कौतुक करतो. त्यांची पडद्यामागची भूमिका मोलाची आहे. वर्ल्डकपनंतर नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया द्रविड यांनी दिली.
प्रतिक्रिया
मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी राहुल द्रविडपेक्षा चांगला कोणी असू शकत नाही. द्रविड यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. संघासोबत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. आमचे विश्वचषक अभियान एखाद्या विलक्षण कामगिरीपेक्षा कमी नव्हते. चांगल्या प्रदर्शनासाठी संघाला व्यासपीठ तयार करून दिल्यामुळे तो कौतुकास पात्र आहे. आवश्यक असलेले सर्व समर्थन देण्यासाठी आम्ही नक्कीच मदत करू.
जय शाह, बीसीसीआय सचिव
पर्याय नाही म्हणून द्रविड?
बीसीसीआयने नाही होय करत अखेर द्रविड आणि इतर कोचिंग स्टाफचा वर्ल्डकपनंतर संपलेला करार अखेर वाढवला आहे. दरम्यान, बीसीसीआयने टी 20 वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून आधी आशिष नेहराला गळ घातली होती. मात्र कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर हे राहुल द्रविड यांचा करार वाढवण्याच्या मताचे होते. बीसीसीआयने भारताच्या टी 20 संघासाठी नेहराला मुख्य प्रशिक्षक बनवण्याचा विचार केला होता. बोर्डाकडून नेहराला या पदासाठी प्रस्ताव देखील दिला गेला. पण माजी वेगवान गोलंदाजाने हा प्रस्ताव नाकारला, असे सांगितले जात आहे. अशात नेहराने प्रशिक्षक पदाची ऑफर धुडकावून या सर्वांना मुदतवाढ दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नेहरा मागच्या दोन आयपीएल हंगामांमध्ये गुजरात टायटन्स संघाचा प्रशिक्षक आहे. गत हंगामात गुजरात टायटन्स संघ नव्याने सामील झाला. आपल्या पहिल्याच हंगामात गुजरातने आयपीएल ट्रॉफी जिंकली. संघाच्या या विजयात मुख्य प्रशिक्षक नेहराचे मोलाचे योगदान होते. नेहराच्या कोचिंग स्टाईलचेही चांगलेच कौतुक झाले होते. याच कारणास्तव बीसीसीआयकडून त्याला भारतीय टी 20 संघाच्या प्रशिक्षकपदासाठी विचारणा केली गेली असावी. पण हा प्रस्ताव नेहराने नाकारल्यामुळे आगामी आयपीएल हंगामात देखील तो गुजरातच्या प्रशिक्षकपदी कायम असेल.
नव्या वर्षात भारत करणार लंकेचा दौरा
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी 20 मालिका खेळत आहे. यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. आफ्रिका दौऱ्यानंतर नव्या वर्षात जानेवारीमध्ये भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. अशातच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने नव्या वर्षाचे आपले आंतरराष्ट्रीय कॅलेंडर जाहीर केले आहे. श्रीलंकेचा संघ वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपनंतर भारताविरुद्ध मालिका खेळणार आहे. भारत जुलै ऑगस्ट दरम्यान वनडे आणि टी 20 मालिकेसाठी श्रीलंकेत जाणार आहे. या दौऱ्यात ते तीन वनडे व तीन टी 20 सामने खेळतील, अशी माहिती लंकन बोर्डाने दिली आहे.