पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्राच्या राजकारणात जे सुरू आहे, ते अत्यंत किळसवाणे असून, हा मतदारांचा घोर अपमान आहे. या सर्व गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रात शरद पवार यांनीच केली असून, शेवटही पवारांकडेच होत आहे. त्यांनी पेरले तेच उगवले असल्याची प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. घडय़ाळाने काटा काढला, की काटय़ाने घडय़ाळ काढले हे मला माहिती नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
राज ठाकरे म्हणाले, राज्यातील राजकीय घडामोडी अनाकलनीय आहेत. महाराष्ट्रामध्ये जनमताचा कानोसा घेतला, तर प्रत्येक घरात तुम्हाला शिव्या ऐकायला मिळतील. हा मतदारांचा घोर अपमान आहे. या सर्व गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रात शरद पवार यांनीच 1978 साली पुलोदचा प्रयोग करून केली होती. त्यापूर्वी महाराष्ट्रात असे काही घडले नव्हते. त्यामुळे या गोष्टींची महाराष्ट्रात सुरुवात पवारांनीच केली आणि शेवटही पवारांकडेच झाला.
बहुदा हे पवारांनीच पेरले असावे
प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ हे अजित पवारांबरोबर जाण्यासारखे नाहीत. ते अजित पवारांसोबत जाऊन मंत्रिपद स्वीकारतील आणि वेगळय़ा गोष्टी करतील, असे मला वाटत नाही. अजित पवारांनीही परवा सर्व होर्डींगवर शरद पवारांचा फोटो लावा, असे सांगितले. त्यामुळे हे सर्व आकलनाच्या पलीकडचे आहे. मी परवा म्हटल्याप्रमाणे उद्या सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या, तरी आश्चर्य वाटायला नको. ही गोष्ट काही अचानक घडली, असे दिसत नाही. गेले कित्येक दिवस वातावरणामध्ये ती चालू होती आणि काल ती दिसली. त्यामुळे बहुदा हे पवारांनीच पेरले असावे, असेही राज ठाकरे म्हणाले.
कोणाच्या सोंगटय़ा कोणाच्या भोकात तेच कळत नाही
कॅरम इतका चुकीचा फुटला आहे, की कोणाच्या सोंगटय़ा कोणाच्या भोकात तेच कळत नाही, अशी मिश्कील टिप्पणीही राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केली. मी आमच्या लोकांना कालच म्हणालो, की तुम्हीच फक्त आहात की तुम्ही मनसेचे आहात. बाकी कोण कुठल्या पक्षात आहेत हेच कळत नाही. मात्र, महाराष्ट्राची ही दुर्दैवी परिस्थिती आहे, महाराष्ट्रात असे कधीच झाले नव्हते, असे राज यांनी नमूद केले.
दरम्यान, सोमवारी मुंबईत झालेल्या मनसेच्या बैठकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी कुठलीही मागणी कोणी केली नाही, असे स्पष्ट करताना या सर्व गोष्टी तुम्ही बोलायला लागला, तर ते या लोकांना हवेच आहे. निदान पत्रकारांनी तरी काही गोष्टीवर ठाम राहणे गरजेचे आहे, असे उत्तर राज यांनी दिले.