रायगड : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात असलेल्या ओएनजीसी प्रकल्पामधून कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात गळती झाली. या गळती ही मांगीन देवी मंदिराला लागून असणाऱ्या नाल्यातून एचआय गळती झाली असून, या तेलाचा प्रचंड तवंग येथील नाल्यासह समुद्राच्या पाण्यावर पसरला आहे. त्यामुळे तेलाची दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. अशा प्रकारच्या घटना कंपनीकडून वारंवार होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाहीतर उरणची भोपाळपेक्षाही भयानक परिस्थिती होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत शासकीय यंत्रणेला त्वरित कळवण्यात आले दुर्दैवाने कोणताच अधिकारी घटनास्थळी आला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
शुक्रवारी पहाटेपासून तेल गळती झाल्याचे लक्षात येताच प्रकल्पा कडून नाल्या मध्ये आलेले तेल समुद्रामध्ये जात असताना ते थांबवण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न सुरू करण्यात आला. तर किनाऱ्यावर आलेल्या तेलाचा जाड थर जमा करण्यासाठी उरण ओएनजीसी प्रकल्पामधून होणारी तेलगळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. किनाऱ्यावर आलेला तेलाचा जाड थर जमा करण्यासाठी कर्मचाऱ्यांसह आवश्यक असणारी सर्व यंत्रणा घटनास्थळी कार्यरत झाल्या आहेत. दरम्यान, येथील नाल्यातून बाहेर येणारे तेल येथील पिकत्या शेत जमिनीमध्ये जात असल्याने, शेतपिकाचे नुकसान होणार असल्याचा दावा येथील स्थानिक शेतकरी करत आहेत. समुद्राच्या पाण्यामध्ये तेल मिसळल्याने या परिसरात पारंपारिक रित्या केला जाणारा मासेमारी व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मासेमारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांनाही याचा फटका बसणार आहे.
समुद्रातील आणि नाल्यातील तेल काढण्याचे काम काही दिवसांपूर्वी ठेकेदाराला वर्ग करण्यात आले आहे, त्यामुळे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याची माहिती कंपनीच्या कामगारांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. तरी कंपनी प्रशासन व शासकीय यंत्रणेने याची वेळीच दखल घ्यावी अन्यथा त्याचे दुष्परिणाम येथील स्थानिक जनतेला भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.