शहरात विविध संघटनांतर्फे आदरांजली
बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी शिवसेनेने पुकारलेल्या चळवळीत 67 शिवसैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. मुंबई, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात हुतात्मे झालेल्या शिवसैनिकांना गुरुवारी बेळगावमध्ये अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. कोनवाळ गल्ली येथील सिंहगर्जना युवक मंडळ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व म. ए. समितीतर्फे मान्यवरांच्या हस्ते हुतात्म्यांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणसांवर कर्नाटक सरकारकडून वारंवार या ना त्या कारणाने अन्याय सुरूच आहे. मराठी भाषिकांना वारंवार डिवचले जात आहे. मात्र, याला न जुमानता मराठी भाषिकांनी आपला लढा सुरूच ठेवला आहे. सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी सुरू असलेले प्रयत्न यापुढेही असेच सुरू राहतील, यासाठी महाराष्ट्र सरकारनेही सीमावासियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, माजी उपमहापौर शिवाजी सुंठकर, रेणू किल्लेकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे किरण गावडे, शुभम शेळके, माजी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, तसेच सिंहगर्जना युवक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.