विटा प्रतिनिधी
हजारो भाविकांच्या उपस्थितीत विट्याचा ऐतिहासिक दसरा सोहळा पार पडला. या दसरा सोहळ्यात विट्याच्या दीडशे वर्षांहून अधिक परंपरेच्या दसरा पालखी शर्यतीत तब्बल पाच वर्षांनंतर विट्याच्या पालखीने बाजी मारली. ही शर्यत पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती. हा दसरा पालखीचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील भाविकांसह तालुक्यातील देशभर पसरलेले गलाई व्यवासायिक आले होते.
येथील गांधी चौकातील काळेश्वर मंदिर ते खानापूर नाक्यावरील सिमोल्लंघन मैदाना पर्यंतच्या रस्त्यावर लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. शर्यत मार्गाच्या शेजारील इमारतींवर उभा राहून नागरिक शर्यतीचा आनंद घेतला. पालखी शर्यतीच्या निमित्ताने शहरात पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम, पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज दसऱ्या दिवशी मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शर्यत सुरू झाली. तत्पूर्वी येथील श्री भैरवनाथ मंदिराजवळील मैदानात विटा येथील रेवणसिद्ध आणि श्रीक्षेत्र मुळस्थानच्या श्री रेवणसिद्ध नाथाच्या पालख्या आल्या. यावेळी विट्याचे ग्रामदैवत भैरवनाथ, सिद्धनाथ, म्हसवड सिद्धनाथ देवाच्या पालख्या या ठिकाणी दाखल झाल्या. काळेश्वर मंदिरा जवळ एकत्रित सर्व पालख्यांतील श्रींच्या मूर्त्यांची आरती करण्यात आली त्यानंतर विटा आणि मूळस्थान या दोन पालकांमध्ये शर्यत झाली. सुरुवातीपासूनच दोन्ही पालख्या एकमेकांना खेटून होत्या. दोन्ही बाजूचे समर्थक आपल्या पालखीसाठी धावत होते. दगडी पाण्याच्या टाकीपासूनच्या टप्प्यात विट्याची पालखी पुढे होती. कराड रस्त्याला प्रथमेश मेडिकल समोर मूळस्थान ची पालखी दाबण्यात आली, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत विटा आणि मूळस्थानच्या पालखीत बरेच अंतर पडले. सुरुवातीपासूनच पालख्यांची आडवा आडवी सुरू होती. विट्या ची पालखी पुढे निघून गेल्यानंतर मूळस्थानची पालखी पाठीमागून तितक्याच जोमाने पुढे गेली. यानंतर स्टँड परिसरात विट्याच्या पालखीवर २०-२५जण तुटून पडले. त्यामुळे काहीकाळ इथे विट्याची पालखी थांबवली गेली. तेवढ्यात मूळस्थानची पालखी पुढे गेली.
त्यानंतर खानापूर नाक्यावरून पुढे निघाल्या नंतर मैदानात पुन्हा पालख्यांमध्ये आडवा आडवी झाली. यावेळी गर्दीतून मार्ग काढीत पुढे जात असताना मुळस्थानच्या पालखी खाली खेचण्यासाठी एकदम ५०-६० जण गेले. या झटापटीत काही जणांना मारही लागला. एका बाजूला पोलीस, दुसऱ्या बाजूला विटा आणि मूळस्थान चे लोक यांच्या गर्दीत विट्या ची पालखी सर्वात आधी शिलांगण मैदानावर पोहोचली आणि ही पालखी शर्यत जिंकली.
त्यानंतर श्री भैरवनाथाच्या नावानं चांगभलं असा गजर करीत श्री भैरवनाथ, श्री खरसुंडी सिद्धनाथ आणि श्री म्हसवड सिद्धनाथ देवाच्या पालख्या सवाद्य मिरवणुकीने सिमोल्लंघन मैदानावर दाखल झाल्या. ‘नाथबाबाच्या नावानं चांगभलं’ असा जयजयकार करीत भाविकांनी आरती झाल्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. एकमेकांना सोन्याची देवाण-घेवाण करीत विजयादशमीचा आनंद लुटला. विशेष म्हणजे शर्यतीच्या दोन्ही पालख्यात श्री रेवण सिद्ध देवाच्या मूर्ती असतात.