संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे उद्गार : सियाचीन बेस कॅम्पचा दौरा
वृत्तसंस्था/ सियाचीन
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी सियाचीन बेस कॅम्पचा दौरा करत याला भारताच्या शौर्य अन् पराक्रमाची राजधानी संबोधिले आहे. राजनाथ सिंह यांनी लडाखमध्ये सियाचीन ग्लेशियरच्या कुमार पोस्टवर तैनात सशस्त्रदलाच्या जवानांशी संवाद साधला आहे. तसेच जवानांना त्यांनी मिठाईचे वाटप केले आहे.
जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्र सियाचीन ग्लेशियरवर हे सैनिक देशाचे रक्षण करतात. याकरता मी त्यांचे आभार मानतो. सियाचीनची भूमी ही काही साधारण नाही, ही भूमी देशाच्या सार्वभौमत्व आणि दृढतेचे प्रतीक आहे. ही भूमी आमच्या राष्ट्रीय संकल्पाचे प्रतिनिधित्व करते. आमची राष्ट्रीय राजधानी दिल्ली आहे, तर मुंबई आमची आर्थिक राजधानी आहे आणि बेंगळूर ही आमची तंत्रज्ञान राजधानी आहे, सियाचीन भारताच्या शौर्य अन् पराक्रमाची राजधानी असल्याचे उद्गार राजनाथ सिंह यांनी काढले आहेत.
राजनाथ सिंह यांनी सियाचीन बेस कॅम्पमध्ये युद्धस्मारकाला पुष्पांजली अर्पण करत शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय सैन्याने मागील आठवड्यात सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण सियाचीन ग्लेशियरवरील स्वत:च्या उपस्थितीला 40 वर्षे पूर्ण केली. काराकोरम रेंजमध्ये सुमारे 20 हजार फुटांच्या उंचीवर असलेल्या सियाचीन ग्लेशियरला जगातील सर्वात उंच युद्धभूमी मानण्यात येते, तेथे सैनिकांना शीतदंश आणि वेगवान वाऱ्यांना सामोरे जावे लागते.
ऑपरेशन मेघदूत अंतर्गत भारतीय सैन्याने 1984 मध्ये सियाचीन ग्लेशियरवर स्वत:चे पूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले होते. मागील काही वर्षांमध्ये भारतीय सैन्याने सियाचीनमधील स्वत:ची उपस्थिती मजबूत केली आहे.