आज गुरुवारी राज्यसभेत अभुतपुर्व ‘घोषणायुद्ध’ पाहायला मिळाली. पावसाळी अधिवेशनात मणिपूर मुद्द्यावर पंतप्रधानांनी काहीतरी प्रतिक्रिया द्यावी या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या ‘इंडीया’ या नविन आघाडीच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर परराष्ट्र व्यवहारांशी संबंधित मुद्द्यांवर सभागृहाला संबोधित करत असतानाही हा गोंधळ झाला. विरोधकांनी ‘इंडिया.. इंडिया’ अशा घोषणा करून पंतप्रधानांचा निषेध करणाऱ्या अनेक घोषणा दिल्या. तरतर विरोधकांच्या घोषणांना उत्तर म्हणून सत्ताधाऱ्यांनी ‘मोदी…मोदी’ अशा घ़ोषणा दिल्या.
सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आम्ही चर्चेला तयार आहोत पण विरोधक ऐकायला तयार नसल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, “मला गेल्या महिन्यात झालेल्या घडामोडींची माहिती सभागृहाला द्यायची होती. पंतप्रधानांचा अमेरिका दौरा अतिशय यशस्वी झालेला तुम्ही पाहिला आहे… पण सभागृहात विरोधक ऐकायला तयार नाहीत याचे वाईट वाटते. त्यांना देशाच्या प्रत्येक गोष्टीवर टीका करायची आहे असे दिसून येत आहे,” अशी टिप्पणी त्यांनी केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, “परराष्ट्र धोरण हे असे क्षेत्र आहे जिथे आपण सहसा एकत्र काम करतो. देशात वाद होऊ शकतो पण देशाबाहेर एकजूट दाखवायला हवी. आज विरोधकांनी केलेल्या वर्तनाकडे लक्ष दिले पाहिजे, जेव्हा राष्ट्रहिताचा विचार केला जातो तेव्हा राजकारण बाजूला ठेवले पाहीजे.” असेही ते म्हणाले.