औरंगाबादमधील विठ्ठल गोरे यांनी ५ मिमी लांबी आणि केवळ १४० मिलि ग्रॅम वजनाची तोफ बनवलीय. आश्चर्यकारक म्हणजे ही तोफ उडवता देखील येऊ शकते. त्यामुळं ही तोफ सर्वांच्या चर्चेचा विषय बनलाय. नेमकी ही तोफ बनवली तरी कशी हे जाणून घेऊया.
औरंगाबादचे रहिवासी असणारे विठ्ठल यांना इतिहासाची आवड आहे.. इतिहासकालीन वस्तू तयार करण्याची आवड असून यापूर्वीही विठ्ठल यांनी लहान तोफांची निर्मिती केलीय आणि त्यातूनच छोटय़ा तोफेच्या निर्मितीचा संकल्प केला गेला. आणि साकारली सर्वात लहान तोफ.
औरंगाबाद जिह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव इथल्या शेतकरी कुटुंबातील विठ्ठल उत्तमराव गोरे. परिस्थितीच्या कारणास्तव त्यांनी 12 वी नंतर शिक्षण सोडलं. त्यानंतर काम शोधण्यासाठी औरंगाबादला गेले.
14 वर्षे त्यांनी एका खासगी कंपनीत काम केलं. त्यानंतर स्वतःचे वर्कशॉप सुरु केलं. कोणतीही पदवी नसताना त्यांनी कौशल्यावर दिला. कधी कधी मित्रांच्या इंजिनिअरिंगच्या पुस्तकातील धडे वाचून संकल्पना राबवल्या.
अशाच एका संकल्पनेतून त्यांनी दोन महिन्यांपूर्वी दोन फूट लांबीच्या तोफांची निर्मिती केली. पण यापेक्षाही लहान तोफ बनवण्याचा सल्ला मित्रांनी दिला. त्यानुसार त्यांनी दहा इंच लांबीच्या तोफ बनवली. पण याहून लहान तोफ असावी असे त्यांना प्रकर्षाने वाटले. आणि सुरू झाला जगातील सर्वात लहान तोफ बनवण्याचा प्रयोग. पण याआधीही अशा तोफा कोणी बनवल्या होत्या का ? हे सुद्धा पाहूया
राजस्थानमध्ये जयपूर येथील कुंजबिहारी सोनी यांनी 1971 मध्ये साली भारतातील सर्वात लहान तोफ बनवली होती. तिची लांबी 11 मीमी आणि उंची 8 मीमी व वजन 1.2 ग्रॅम आहे.
तर जगातील सर्वात लहान तोफ हर्ने हल यांनी बनवलीय. आहे. ती 6 मिलीमीटर लांब तर 3 मिलीमीटर उंच आहे. त्याहून लहान तोफ बनवण्याचा प्रयत्न विठ्ठल यांनी केलाय. शिवाय गोरे यांनी कटय़ार, वाघनखे, जातं, तसेच शेतीची औजारे यांचीही निर्मिती त्यांनी केलेली आहे. आतापर्यंत त्यांनी 10 ते 12 तोफा विकल्या आहेत. पण ते विश्वासातील लोकांनाच तोफा बनवून देतात. शिवाय त्यांच्याकडून एक हमीपत्र लिहून घेतात. त्यात स्पष्टपणे लिहलेलं असतं की आम्ही तोफेचा गैरवापर किंवा तोफ या ऐतिहासिक गोष्टीचा अपमान होईल अशी कृत्य करणार नाही.