जनजीवन विस्कळीत; शेतातील उभा ऊस आडवा, खरीप पीक पाण्यात; एका रात्रीत 48 मिलीमीटर पावसाचे नोंद; त्वरित पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी
अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यात सलग तीन दिवस दिवसरात्र पावसाची बॅटिंग सुरुच आहे. या दमदार पावसामुळे तालुक्यात पुन्हा एकदा नदी, नाले, ओढे तुडूंब भरुन वाहत आहेत. शेतकरी मात्र या पावसामुळे त्रस्त झाला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यंदा तालुक्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सुरु झालेला पाऊस आजूनही थांबण्याच्या मनस्थितीत नाही. दररोज दमदार पावसाबरोबर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतातील उभा ऊस आडवा होऊन पडला आहे. तर संपूर्ण खरीप पीके पाण्यात गेल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात पहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई करून मिळण्याची मागणी शेतकऱ्यांकडून तालुका प्रशासनाकडे आहे. काही भागात तर या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने अनेक गरीब कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
काल एका रात्रीत हंजगी व जेऊर मंडळात 48 मिलीमीटर पाऊस झाला आहे. बुधवारी रात्री तालुक्यात आठ वाजता सुरु झालेला पाऊस रात्री उशीरापर्यंत सुरुच होता. पावसा बरोबर वाऱ्याचा वेग अधिक असल्याने अनेक लोकांच्या घरावरील पत्रे उडाले आहेत तर अनेक गावातून वीज खंडित झाल्याने गावकऱ्यांना अख्खी रात्र अंधारातच काढावी लागली. तर अनेक कुटुंब जोरदार वाऱ्यासह पावसामुळे अख्खी रात्र जागून काढली. इकडे प्रशासन मात्र अजूनही पंचनामा करीता कुठले मुहूर्त शोधत आहे हे कळेना. काल रात्री झालेल्या पावसामुळे जेऊर मंडळात शेत शिवारात सर्वत्र पाणीच पाणी साचलेले दृश्य पहावयास मिळाला. कापणीस आलेले खरीप पीक आता हाताशी लागणार की मातीमोल होणार या चिंतेने शेतकरी त्रस्त झाला आहे. काढणीस आलेल्या खरीप पिकात सध्या बर्याच ठिकाणी पाणी साचले आहेत, तर काही भागात उडीद, मूग,सोयाबीन पीक काढून शेतात ठेवले असता आज जोरदार पाऊस झाल्याने संपूर्ण पीक पाण्यात उभे टाकले आहे. उभा ऊस मात्र यापावसामुळे भुईसपाट झाला आहे.
ही अतीवृष्टी पाच तारखेपर्यंत राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. सध्या या दमदार पावसामुळे शेतातील विहीर, बोअरवेल मधील मधील पाणी साठ्यात मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे.