कडाडी यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी : बेळगाव-वास्को रेल्वेसाठीही आग्रह
बेळगाव : कोरोना काळापासून बंद असलेली बेळगाव-वास्को (गोवा) फास्ट पॅसेंजर रेल्वे सुरू करा, तसेच बेळगाव-पुणे या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन कडाडी यांनी बेळगाव परिसरातील रेल्वे संबंधित अनेक विषयांवर चर्चा केली. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नांतून बेळगाव-वास्को एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. यामुळे गोव्यातील प्रवासी खरेदीसाठी बेळगावमध्ये रेल्वेने दाखल होत होते. तसेच बेळगावमधील पर्यटक गोव्याला रेल्वेचा सुखद प्रवास करीत होते. परंतु कोरोना काळापासून ही एक्स्प्रेस बंद ठेवण्यात आल्याने बेळगावच्या व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे ही एक्स्प्रेस सुरू झाल्यास व्यवसायाला चालना मिळणार आहे.
बेळगाव व पुणे या दोन शहरांमध्ये संस्कृती वारशासोबतच शैक्षणिक, साहित्य, नाट्या, आयटी या क्षेत्रांमध्ये देवाण-घेवाण होत असते. यामुळे बेळगावमधील अनेक रहिवाशी पुणे येथे कामानिमित्त दररोज प्रवास करत असतात. यासाठी बेळगावमधून पुण्याला वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली. कित्तूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये रेल्वेचे सुटे भाग तयार करण्याचा कारखाना सुरू झाल्यास स्थानिकांना रोजगार तर मिळेल त्याचबरोबर त्या परिसराचा विकासही होईल. त्यामुळे रेल्वेने या प्रकल्पाचा विचार करावा, अशी मागणी कडाडी यांनी केली. मुंबई-गदग एक्स्प्रेस बळ्ळारीपर्यंत वाढवावी, अशीही मागणी त्यांनी केली. रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राज्यसभा सदस्य के. नारायण उपस्थित होते.