आयएमए प्रमुखांना फटकार सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय राखून : वादग्रस्त जाहिरातीचे प्रकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पतंजली समूहाच्या कथित भ्रामक जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान योगगुरु बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी बालकृष्ण न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाच्या आदेशाच्या अवमानाच्या एका प्रकरणी न्यायाधीश हिमा कोहली आणि अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला आहे. तर दुसरीकडे बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांना न्यायालयाने सुनावणीस उपस्थित न राहण्याची सूट दिली आहे.
तसेच सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीला प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. भ्रामक जाहिराती आणि परवाने रद्द करण्यात आलेली औषधे बाजारातून परत घेण्यासाठी कोणती पावले उचलली हे या प्रतिज्ञापत्रात नमूद करावे लागणार आहे. लोकांना प्रभावित करणारे कुठलेही उत्पादन किंवा सेवेची जाहिरात भ्रामक आढळून आल्यास याकरता सेलेब्रिटीज आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना देखील समान स्वरुपात जबाबदार ठरविले जावे असे खंडपीठाने म्हटले आहे.
न्यायालयाने आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनला फटकारले आहे. आयएमएफ प्रमुख आर. व्ही. अशोकन यांच्याकडून देण्यात आलेल्या मुलाखतीवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तर याप्रकरणी अशोकन यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. आयएमएफ प्रमुख अशोकन यांनी या मुलाखतीत सर्वोच्च न्यायालयावरच टीका केली होती. सोफ्यावर बसून प्रसारमाध्यमांना मुलाखत देत न्यायालयाची खिल्ली उडवू शकत नसल्याचे न्यायाधीश हिमा कोहली यांनी अशोकन यांना सुनावले आहे.
14 उत्पादने निलंबित
पतंजली आयुर्वेद लिमिटेड आणि दिव्य फार्मसीच्या 14 उत्पादनांच्या निर्मिती परवान्याला तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आल्याची माहिती उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणाने सर्वेच्च न्यायालयाला दिली होती.