ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मेहुणे श्रीधर पाटणकर यांची ईडी चौकशी थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंनी मालेगावातील सभेत शिंदे गटावर निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर देताना कांदे म्हणाले, ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला, त्यांच्यासोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी सत्ता स्थापन केली. भाजपने आपल्याला त्रास दिला, असे मानले तरी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतरणा करण्याची काही गरज नव्हती. खरी गद्दारी आणि बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा कोणी केली असेल तर ती उद्धव ठाकरेंनी केली. आता त्यांनी भावनेचे राजकारण करू नये. सगळय़ा जनतेला माहिती आहे. आम्हालाही खास करून माहिती आहे, मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीमध्ये असलेल्या डायरेक्टरांच्या चौकशी थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला.
शिंदे गटावर सातत्याने खोके घेतल्याचा आरोप होतो. आम्ही सरकार बदलण्यासाठी एक रुपया जरी घेतला असेल तरी राजकारणातून संन्यास घेऊ. म्हैसकर, आयआरबी यासारख्या ठेकेदारांच्या कंपन्यांकडून कोणाला पैसे मिळाले, कसे मिळाले? उद्धव ठाकरेंची नार्कोटेस्ट करा, म्हणजे पुरावे मिळतील, असेही कांदे म्हणाले.