भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात ज्याप्रमाणे देशाच्या सर्वसाधारण 225 मतदारसंघांमध्ये थेट संघर्ष आहे, तसा भारतीय जनता पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यांच्यातही जवळपास 200 जागांवर थेट संघर्ष आहे. इतकेच नव्हे, तर काँग्रेसने अनेक प्रादेशिक पक्षांची आघाडी केली असली तरी या पक्षाचीही काही राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांशी स्पर्धा आहे. तसेच, विरोधी पक्षांच्या आघाडीतील पक्षही एकमेकांशी लढत देत आहेत. शिवाय काही मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष आणि काँग्रेसचे मित्रपक्ष यांच्यातही स्पर्धा आहे. थोडक्यात सांगायचे तर या महासंग्रामाचा अंतिम परिणाम 1. भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस थेट संघर्ष (साधारण 225 मतदारसंघ), 2. भारतीय जनता पक्ष विरुद्ध प्रादेशिक पक्ष (साधारण 200 मतदारसंघ), 3. विरोधी पक्षांच्या आघाडीतील पक्षांच्या एकमेकांशी लढती (साधारण 50 मतदारसंघ) 4. काँग्रेस विरुद्ध प्रादेशिक पक्ष (साधारण 50 मतदारसंघ) या चार प्रकारांच्या संघर्षांवर अवलंबून आहे. यांपैकी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील थेट संघर्षासंबंधी जाणून घेण्याचा प्रयत्न कालच्या सदरात करण्यात आला आहे. या सदरात ऊर्वरित 3 संघर्षांसंबंधी माहिती घेऊ. हे संघर्ष कोणत्या राज्यांमध्ये आहेत, कशा प्रकारचे आहेत, त्यांच्यात कोण वजनदार ठरलेला आहे, कोण वजनदार होऊ शकतो, आणि त्यांचा एंकदर परिणाम असा होणार आहे, हा आजच्या सदराचा विषय आहे…
भारतीय जनता पक्ष विरुद्ध प्रादेशिक पक्ष
? या संघर्षात दोन उपप्रकार आहेत. एक, भारतीय जनता पक्ष विरुद्ध विरोधकांच्या आघाडीतील काँग्रेस वगळता इतर प्रादेशिक पक्ष आणि दोन, जे पक्ष कोणत्याही आघाडी किंवा युतीत नाहीत, असे प्रादेशिक पक्ष. जे प्रादेशिक पक्ष कोणत्याही युतीत नाहीत, त्यांच्यापैकी अनेकांनी गेल्या 10 वर्षांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी अनेक मुद्द्यांवर संसदेत सहकार्यही केले आहे. मात्र निवडणुकीत भारतीय जनता पक्ष या पक्षांशी संघर्ष करीत आलेला आहे.
? विरोधकांच्या आघाडीतील प्रादेशिक पक्ष प्रामुख्याने समाजवादी पक्ष (उत्तर प्रदेश), राष्ट्रीय जनता दल (बिहार), आम आदमी पक्ष (दिल्ली आणि पंजाब), नॅशनल कॉन्फरन्स (जम्मू-काश्मीर), तृणमूल काँग्रेस (पश्चिम बंगाल), भारत राष्ट्र समिती (तेलंगणा), डावी आघाडी (केरळ), द्रमुक (तामिळनाडू), अण्णाद्रमुक (तामिळनाडू) आणि वायएसआर काँग्रेस (आंध्र प्रदेश) अशा पक्षांचा समावेश आहे. या सर्व राज्यांमध्ये मिळून एकंदर लोकसभेच्या 293 जागा आहेत.
? या जागांपैकी काँग्रेससाठी विरोधी पक्षांच्या आघाडीकडून 37 जागा सोडण्यात आल्याचे दिसून येते. या जागा वगळता भारतीय जनता पक्षाचा संघर्ष विरोधी पक्षांच्या आघाडीतील प्रादेशिक पक्षांशी साधारणत: 200 जागांवर आहे. अद्याप सर्व पक्षांनी त्यांचे सर्व उमेदवार घोषित केलेले नाहीत. परिणामी नेमकी संख्या आत्ताच स्पष्ट होत नाही. महाराष्ट्रात स्थिती आणखीनच जटील आहे. तेथे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसशी चार ते सहा, तर ठाकरे गटाशी 8 जागांवर स्पर्धेत आहे.
मागच्या दोन निवडणुकांमध्ये…
??2014 आणि 2019 या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, पंजाब, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू आदी राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि सध्याच्या विरोधी आघाडीतले प्रादेशिक पक्ष यांच्यात संघर्ष झाला होता. त्यात दक्षिणेत तेलंगणा वगळता या पक्षाच्या हाती काही लागले नव्हते. तथापि, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि बिहार येथे प्रादेशिक पक्षांचा मोठ्या प्रमाणात सफाया झाला होता.
? पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने 2014 च्या निवडणुकीत चमक दाखविली नसली, तरी 2018 च्या निवडणुकीत 42 पैकी 18 जागा जिंकून मोठीच मुसंडी मारली होती. या निवडणुकतही तेथे भारतीय जनता पक्षाचा थेट संघर्ष तृणमूल काँग्रेसशी सर्व मतदारसंघांमध्ये असून दोन्ही पक्ष चुरशीने लढत असल्याचे चित्र आहे. पश्चिम बंगालमध्ये काय होणार यासंबंधी अनेक सर्वेक्षणे आलेली असली तरी प्रत्यक्षात परिणाम 4 जूनला मतगणनेदिवशीच समजेल.