उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे; राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित माहितीपूर्ण प्रदर्शन
कोल्हापूर प्रतिनिधी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे लोककल्याणासाठी अविरतपणे झटले. शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित लक्ष्मी विलास पॅलेस येथील दुर्मिळ कागदपत्रे व छायाचित्र प्रदर्शन माहितीपूर्ण आहे. यामधून राजर्षी शाहू महाराजांचा जीवनप्रवास उलगडला आहे. या प्रदर्शनाला अधिकाधिक नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी बुधवारी येथे केले.
जागतिक वारसा सप्ताहानिमित्त कोल्हापूर वस्तुसंग्रहालय (पुरातत्व विभाग) व पुरालेखागार (पुराभिलेखागार संचालनालय) यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित छायाचित्रे व दुर्मिळ कागदपत्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट होते.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी कांबळे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक अभिरक्षक उदय सुर्वे, पुराभिलेख विभागाच्या सहायक संचालक रुपाली पाटील, माहिती अधिकारी वृषाली पाटील पुराभिलेखाधिकारी गणेश खोडके, उत्तम कांबळे प्रमुख आदी प्रमुख उपस्थित होते.
शाहू जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन शुक्रवार (दि.25)पर्यंत मोफत खुले राहिल. या प्रदर्शनामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दत्तक विधानासंबंधीची कागदपत्रे, त्यांच्या राज्यारोहण समारंभाची कागदपत्रे, राजर्षी शाहू महाराजांनी प्रशासन गतिमान होण्यासाठी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय व पारित केलेले कायदे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या सुधारणा, दीनदुबळ्यांच्या उद्धारासाठी केलेले कार्य, कला, क्रीडा, कृषी, उद्योग क्षेत्रामधील शाहू महाराजांचे कार्य, दुष्काळ व प्लेग काळातील त्यांचे कार्य, या संदर्भातील अधिनियम, महत्वाचा पत्रव्यवहार असे राजर्षी शाहू महाराजांच्या काळातील दुर्मिळ कागदपत्रे व छायाचित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे. त्याचबरोबर शाहू कालीन शस्त्रास्त्रांचेही प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आले आहे.
डॉ. संभाजी खराट म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्याची महती विषद करणारे हे छायाचित्र, दुर्मिळ कागदपत्रे व शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन विद्यार्थी, पालकांसह इतिहास अभ्यासकांसाठीही माहितीपूर्ण आहे. शाहू महाराजांचे विचार व कार्य कानाकोपर्यात पोहचवण्यासाठी असे प्रदर्शन ग्रामीण भागात देखील आयोजित करणे आवश्यक आहे.
वृषाली पाटील म्हणाल्या, राजर्षी शाहू महाराजांच्या महान कार्यामुळेच जगभरात कोल्हापूर जिह्याची वेगळी ओळख आहे. कोल्हापूर संस्थानात त्यांनी विधवा पुर्नविवाहासह महिलांसाठी अनेक कायदे व सोयी सुविधा निर्माण केल्या. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करुन शैक्षणिक हित साधले. राजर्षी शाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्षामध्ये आयोजित केलेले हे प्रदर्शन सर्वांना उपयुक्त ठरेल. यावेळी अर्चना शिंदे यांच्यासह वस्तू संग्रहालय व पुरालेखागार कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.