नाव न घेता हेमंत सोरेनवर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल : इंडिया आघाडीवर साधला निशाणा
वृत्तसंस्था/ धनबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी झारखंडच्या धनबाद येथून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. पंतप्रधान मोदींनी येथे आयोजित जाहीरसभेत केंद्र सरकारच्या विकासकामांचा उल्लेख केला. तसेच झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि तुरुंगात कैद हेमंत सोरेनवर जोरदार निशाणा साधला आहे. झारखंडमधील लोक मोदीला आशीर्वाद देण्यासाठी भर उन्हात मोठ्या संख्येत पोहोचले आहेत. जे येथे आले नाहीत, त्यांच्यापर्यंत माझा नमस्कार पोहोचवा. तसेच मोठ्या आवाजात भारत माता की जय अशी घोषणा द्या, जेणेकरून तुरुंगापर्यंत आवाज ऐकू जावा असे मोदींनी उपस्थित जनसमुदायाला उद्देशून म्हणताना होटवार तुरुंगाच्या दिशेने इशारा केला. याच तुरुंगात हेमंत सोरेन कैद आहेत.
लोकांचे हे प्रेम, आशीर्वाद पाहून किती जन्मांचे पुण्य असेल असा विचार मी कधीकधी करत असतो. जनता माझ्dयावर प्रचंड प्रेम करत असल्याने तिच्यासाठी स्वत:च्या शरीराचा प्रत्येक कण-कण, क्षण खर्च करणार आहे. येथील लोकांनी सिंदरी कारखाना सुरू होणार नाही असेच मानले होते, परंतु मोदीची गॅरंटी होती आणि आता याचे उद्घाटन करून आलो आहे असे उद्गार मोदींनी उपस्थित समुदायाला उद्देशून काढले आहेत.
भाजपचा अर्थ म्हणजे जलद विकास, तर काँग्रेसला केवळ घोटाळे करणेच जमते. धनबादमध्ये देखील सौभाग्य योजनेमुळे सुमारे एक लाख घरांमध्ये मोफत वीजजोडणी प्राप्त झाली आहे. जेथे इतरांपासून असलेली अपेक्षा संपते, तेथूनच मोदीची गॅरंटी सुरू होती. देवघरमध्ये 2018 साली विमानतळाचे भूमिपूजन केले होते, तर 2022 मध्ये हे विमानतळ सुरू देखील झाले. देवघर एम्सचे शिलान्यास आणि लोकार्पण देखील जनतेच्या याच सेवकाने केले असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
घराणेशाही लक्ष्य
झामुमो आणि काँग्रेसचे घराणेशाहीचे सरकार राज्यात आल्यापासून अव्यवस्था वाढली आहे. तुष्टीकरणामुळे राज्यात घुसखोरीत वाढ झाली आहे. राज्यात लूट सुरू असून खंडणीखोरीला ऊत आला आहे. जेएममचा अर्थ ‘जम कर के खाओ’ असा आहे. परंतु काँग्रेस आणि झामुमोने जनतेचा जो पैसा लुटला आहे, तो परत करावाच लागेल हे मोदीची गॅरंटी आहे. काँग्रेस आणि झामुमाचे नेते चौकशीपासून पळत असल्याची टीका मोदींनी केली आहे.
आदिवासींना मतपेढी समजण्याचा प्रकार
पंतप्रधानांनी या सभेत आदिवासींचा देखील उल्लेख केला. काँग्रेस आणि इंडिया आघाडी आदिवासींना केवळ मतपेढी समजतात. घराणेशाही असलेले पक्ष केवळ स्वत:च्या घराण्याचाच विचार करतात. परंतु मोदी जे काही करतोय ते लोकांसाठी, त्यांच्या मुलांसाठी करत आहे. झामुमोच्या नेत्यांना लोकांच्या मुलांची चिंता नाही. परंतु मोदी जनतेची चिंता करणार आहे. मोदी ज्या योजना आणतो, त्यात इंडिया आघाडी अडथळे आणत आहे. मोफत धान्य योजनेला इंडिया आघाडीने विरोध केला. राज्यातील इंडिया आघाडीचे सरकार हे विकासविरोधी अन् जनताविरोधी आहे. तर थेट लोकांपर्यंत लाभ पोहोचावा असा मोदीचा प्रयत्न आहे. आयुष्मान योजना, किसान निधी, मनरेगाची मजुरी सर्वांना थेट मिळते, यात कुठलाच मध्यस्थ नाही. यामुळे इंडिया आघाडीच्या हस्तकांचे कमिशन बंद झाले आहे. याचमुळे हे नेते आता मला शिव्यांची लाखोली वाहत असल्याचा दावा मोदींनी केला आहे.