गोवा फॉरवर्डची प्रतिक्रिया : खरा सिनेमा पावसाळ्यात दिसणार
प्रतिनिधी/ मडगाव
शनिवारी फक्त दोन तास पाऊस पडूनही पणजीत पाणी साचल्याने जी स्थिती निर्माण झाली तो फक्त एक ट्रेलर आहे. खरा सिनेमा दोन महिन्यांत येणाऱ्या पावसाळ्यात दिसणार आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केली आहे. गटारे तुंबल्यामुळे जिथे जिथे पाणी साचले त्या त्या भागाची पणजी महानगरपालिकेने त्वरित पाहणी करून पाण्याच्या वाटा मोकळ्या करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्मार्ट सिटी प्ऱकल्पामुळे पणजीची कशी दुर्दशा झाली आहे ते गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी विधानसभा अधिवेशनात लोकांसमोर आणले होते. त्यानंतर पणजी शहराची स्थिती पाहण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना स्वत: रस्त्यावर उतरावे लागले. त्यानंतर पणजी शहरात माजलेला हा गोंधळ निवारण्यासाठी संजीत रॉड्रिग्स यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. मात्र स्थिती हाताबाहेर गेल्यामुळे त्यांनाही फारसे काही करता आले नाही. भाजप सरकारचे राजधानीकडेही कसे दुर्लक्ष होते हे यातून स्पष्ट झाले आहे, असे कामत यांनी म्हटले आहे.
या लोकसभा निवडणुकीत मतदान करताना पणजीच्या तसेच गोव्यातील अन्य भागांतील लोकांनी पणजीची ही दुर्दशा कशी झाली आणि कुणी केली याचा विचार करून मतदान करावे. पणजी शहरात लोकांना धुळीचा आणि ख•dयांचा त्रास कसा होतो हे मतदान करताना त्यांनी डोळ्यांसमोर आणावे आणि नंतरच मतदान करावे, असे आवाहन कामत यांनी केले आहे.