काँग्रेससमोरील आव्हान वाढणार : हैदराबाद, औरंगाबादमध्ये निवडणूक लढविणार
वृत्तसंस्था/ हैदराबाद
आगामी लोकसभा निवडणुकीवरून एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी रविवारी मोठी घोषणा केली आहे. एआयएमआयएम औरंगाबाद, किशनगंज आणि हैदराबाद येथून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. बिहारच्या किशनगंज मतदारसंघात मागील वेळी काँग्रेस नेते मोहम्मद जावेद विजयी झाले होते, तर 2019 मध्ये काँग्रेसने बिहारमधील केवळ याच जागेवर यश मिळविले होते. परंतु यावेळी एआयएमआयएमने स्वत:चा उमेदवार उभा करण्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्रातील औरंगाबाद मतदारसंघात एआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील हे खासदार आहेत. या मतदारसंघात पक्ष पुन्हा निवडणूक लढविणार आहे. तर हैदराबादचे संसदेत असदुद्दीन ओवैसी हेच प्रतिनिधित्व करत आहेत. पक्ष या तिन्ही ठिकाणी उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा ओवैसी यांनी केली असली तरीही उमेदवारांची नावे त्यांनी जाहीर केलेली नाहीत.
बिहारमधील किशनगंज लोकसभा मतदारसंघ हा मुस्लीमबहुल आहे. येथे मोठ्या संख्येत मुस्लीम मतदार आहेत. या मतदारसंघात आतापर्यंत केवळ एकदाच 1967 मध्ये हिंदू उमेदवार एल.एल. कपूर हे विजयी झलो आहेत. किशनगंजमध्ये 68 टक्के लोकसंख्या मुस्लिमांची आहे, तर 32 टक्के लोकसंख्या हिंदूंची आहे. यामुळे या मतदारसंघात मुस्लीम मतदार निर्णायक ठरणार आहेत.
काँग्रेसचा बालेकिल्ला
किशनगंज मतदारसंघाला काँग्रेसचा बालेकिल्ला मानले जाते, काँग्रेसच्या या अभेद्य किल्ल्यात शिरकाव करणे सोपे नाही. मागील तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला आहे. परंतु या बिहारच्या सीमांचल भागात आणि विशेषकरून किशनगंज जिल्ह्यात एआयएमआयएमने राज्य विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळविले होते. येथील मुस्लीम मतदारांनी एआयएमआयएमला मतदान केल्याचे चित्र दिसून आले होते. याचमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत एआयएमआयएमच्या उमेदवारामुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.