कसबा बावड्यातील अशांत ची नवी संकल्पना
कसबा बावडा प्रतिनिधी
शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून कसबा बावड्यातील अशांत मोरे यांनी महालक्ष्मी, तुळजाभवानी, सप्तशृंगी आणि रेणुका माता यांचे अवघ्या एक इंच आकाराच्या सुपारीवर चित्र रेखाटून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घडवले. याबद्दल अशांतचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये धार्मिक स्थळांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक धार्मिक स्थळाचे एक वेगेळे वैशिष्टय आणि इतिहास आहे. सध्या सर्वत्र शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानली जाते. त्यामुळे नवरात्र उत्सवामध्ये महालक्ष्मीचे (अंबाबाईचे) दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातून भाविक येत असतात. या काळात कसबा बावड्यातील मायक्रो आर्टिस्ट अशांत मोरे याने आपल्या कलेतून अवघ्या एक इंचाच्या दुपारीवर महालक्ष्मी, तुळजाभवानी, सप्तशृंगी आणि रेणुका माता या साडेतीन शक्तीपीठातील देवींचे हुबेहूब चित्र रेखाटले आहे.
याबद्दल बोलताना अशांत म्हणाला, एक इंचाच्या सुपारीवर काढलेले देवीचे चित्र ही कला अक्रेलीक वॉटर कलर पेंटिंग असून हे रेखाटण्यासाठी दोन दिवसाचा अवधी लागला. अशांत ने या अगोदर आषाढी एकादशी मध्ये तुळशीच्या पानावर विठ्ठलाचे चित्र रेखाटले होते. लोक मोठ्या आशेने आणि श्रद्धेने या धार्मिक स्थळांवर जाऊन नतमस्तक होतात. याच धार्मिक स्थळांपैकी तीन शक्तिपीठे सुपारीवर साकारले आहे.महाराष्ट्रात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणांवर ही शक्तिपीठे आहेत. असे अशांत मोरे यांनी सांगितले आहे.