पोलीस प्रशासन सुस्त, वाहनधारक हैराण
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे वाहनधारकांची दमछाक होऊ लागली आहे. शहरातील बाजारपेठेत वाहतूक कोंडीची समस्या अधिक जटील बनत चालली आहे. यातून बाहेर पडताना वाहनधारक हैराण होऊ लागले आहेत.
शहरातील मुख्य बाजारपेठेसह खडेबाजार, रामदेव गल्ली, मारुती गल्ली, नरगुंदकर भावे चौक, कलमठ रोड, समादेवी गल्ली, शनिवारखूट, किर्लोस्कर रोड आदी ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच ठरू लागली आहे. शनिवारी आठवडी बाजाराचा दिवस असल्याने यामध्ये अधिक भर पडू लागली आहे.
शहरात वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रस्ते अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. अरुंद रस्ते, रस्त्यावर लावण्यात येणारी अस्ताव्यस्त वाहने आणि वाढती वाहनांची संख्या आदी कारणांमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत पोलीस प्रशासन मात्र उदासीन असल्याचे दिसत आहे. शनिवारी रामदेव गल्ली, नरगुंदकर भावे चौक आदी ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या. यामुळे कोंडीतून बाहेर पडताना वाहनधारकांना कसरत करावी लागली.
शहराची लोकसंख्या 7 लाखांहून अधिक आहे. शिवाय उपनगरांतही वसती वाढली आहे. त्यामुळे वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. एका घरात तीन ते चार वाहने आहेत. यामध्ये चारचाकी वाहनांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे शहरात किरकोळ कामांसाठीही चारचाकी वाहने घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच रिक्षावाल्यांची अडचण होत असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे