पुणे / प्रतिनिधी :
दौंड रेल्वे स्थानकावर 36 रेल्वे गाडय़ा थांबत नसल्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. त्यांना विनाकारण पुणे स्थानकावर जावे लागत आहे. त्यामुळे पुणे, मुंबईहून दक्षिण भारतात जाणाऱ्या काही गाडय़ांना दौंडमध्ये थांबा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
सुप्रिया सुळेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पुणे आणि मुंबई येथून दक्षिण भारतात जाणाऱ्या आणि दक्षिण भारतातून पुण्याकडे येणाऱ्या दैनंदिन आणि साप्ताहिक अशा किमान 36 रेल्वे गाडय़ा दौंड स्थानकावर थांबत नसल्यामुळे दौंडसह या परिसरातील प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. वास्तविक या गाडय़ांना दौंड येथे थांबा देणे आवश्यक आहे. शिर्डी येथून अहमदनगरमार्गे येणाऱ्या प्रवाशांना देखील दौंड हे स्टेशन अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय बारामती, इंदापूर, बारामती, श्रीगोंदा, फलटण, रांजणगाव, शिरवळ या परिसरात जाण्यासाठी वाहतूकीच्या सुविधा उपलब्ध आहेत. परंतू, आत्ता दौंड रेल्वे स्थानकावर या गाडय़ांना थांबा नसल्यामुळे प्रवाशांना या गाडय़ांमध्ये पुण्यातून चढावे लागत आहे. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी दौंड स्टेशनवर या सर्व गाडय़ा थांबणे महत्त्वाचे आणि सोयीचे आहे.
याशिवाय दौंड स्थानकावर या गाडय़ांना थांबा दिल्याने पुणे स्थानकावरील प्रवाशांचा बोजा बऱ्यापैकी कमी होऊ शकेल. रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव आपणास विनंती आहे की, कृपया दक्षिणेकडे जाणाऱ्या व दक्षिणेकडून येणाऱ्या गाडय़ांना दौंड येथे थांबा देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
‘वंदे भारत’लाही दौडमध्ये थांबा द्या
मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची सगळय़ांनाच आतुरता आहे. यापूर्वी वंदे भारत ट्रेनला दौंडमध्ये थांबा देण्याची मागणी केली होती. दौंड हे या मार्गावरील अतिशय महत्त्वाचे जंक्शन आहे. त्यामुळे या एक्सप्रेसचा थांबा दौंडमध्ये देण्यात यावा. मुंबईहून निघणारी ही एक्सप्रेस दादर, कल्याणहून थेट पुण्यात येणार आहे. मात्र या दरम्यानच्या महत्त्वाच्या असलेल्या लोणावळा स्थानकावर या गाडीचा थांबा नाही. त्यामुळे मुंबईहून किंवा सोलापूरहून लोणावळय़ाला जाणाऱ्या पर्यटकांना मात्र पुण्यातच उतरुन पुढचा प्रवास करावा लागणार आहे, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.