भारतातील या नदीचे पाणी आरशाइतके स्वच्छ
सद्यकाळात देशातील नद्या अत्यंत प्रदूषित आहेत, पण मेघालय राज्यात अशी एक नदी आहे, जिला सर्वात स्वच्छ नदीचा मान मिळाला आहे. नदीत नौकाविहार करताना जणू काचेवरून नौका जात असल्याचा भास होतो. या नदीचे नाव उमनगोत असले तरीही ती डौकी नावाने प्रसिद्ध आहे.
पर्यटकांकडून याची छायाचित्रे प्रसारित करण्यात आल्यावर या नदीची समाजमाध्यमांवर चर्चा होऊ लागली आहे. अखेर ही नदी कुठली हे जाणून घेण्यास लोक उत्सुक होते. ही नदी भारत-बांगलादेश सीमेनजीक आशियातील सर्वात स्वच्छ गाव मॉयलनसेंगच्या जवळून वाहते आणि बांगलादेशात जाण्यापूर्वी जयंतिया आणि खासी हिल्सदरम्यान वाहते.
या नदीतील पाणी अत्यंत साफ असल्याने नौका पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून येते. तसेच नदीतील दगड-गोटय़ांचा खचही स्पष्टपणे नजरेत पडतो. 2003 मध्ये मॉयलननोंगला गॉड्स ओन गार्डनचा दर्जा मिळाला होता. अत्यंत स्वच्छ नदीसह तेथील 100 टक्के साक्षरताही सर्वांचे लक्ष वेधून घेते.
तेथे पक्ष्यांच्या किलबिलाटासह नदीत पडणारी सूर्यकिरणे अत्यंत उत्साह निर्माण करणारी असतात आणि एका नैसर्गिक वातावरणाची अनुभूती घडवून आणतात. तेथील वातावरण अत्यंत रम्य असल्याने वाहणाऱया पाण्याचा आवाजही कानाला स्पष्टपणे ऐकू येतो. नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंतचा कालावधी या भागाला देण्यासाठी सर्वोत्तम आहे.
या नदीत मोठय़ा प्रमाणात मासे आढळून येतात. हिवाळय़ात ही नदी अधिकच सुंदर होते. तेथे येणाऱया पर्यटकांना कुठल्याही प्रकारची अस्वच्छता पसरवून नका असे सांगण्यात येते. पण तरीही कुणीही अस्वच्छता निर्माण केल्यास संबंधिताच्या विरोधात कारवाई करण्यात येते.