प्रतिनिधी / संकेश्वर
संकेश्वर शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मे पासून 6 जुलै अखेरपर्यंत एकूण 27 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी दोघांना बेळगाव येथील केएलई इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी प्रत्येकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन वैद्याधिकाऱयांनी केले आहे. दरम्यान संकेश्वरकरांवर कोरोनानंतर डेंग्यूचे संकट उभे ठाकल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यमकनमर्डी येथील 8 व संकेश्वर येथील ढंग, गाडगी, नदी गल्लीसह आझाद रोड या भागातील 19 अशा एकूण 27 जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे संकेश्वर कोरोना फैलावानंतर पुन्हा एकदा हादरले आहे. तसेच येथील सरकारी इस्पितळात 4 संशयित रुग्ण होते. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल अद्याप मिळालेला नाही.
डेंग्यूची लक्षणे
ताप, अंगदुखी, डोकेदुखी, उलटी, पोट दुखी, अंगावर पुरळ येणे अशी प्रमुख लक्षणे आहेत. अशी लक्षणे असल्यास तातडीने नजीकच्या इस्पितळातील वैद्याधिकाऱयांची भेट घेऊन उपचार घ्यावेत. सध्या कोरोना व्हायरसमुळे मोठी दहशत निर्माण झाली असतानाच शहरात डेंग्यूच्या साथीचा होणारा फैलाव शहरवासीयांच्या दृष्टीने डोकेदुखीचा भाग बनला आहे.
खबरदारी घेण्यासाठी नगरपरिषदेला पत्र
सुभाष रोड येथील दाखल झालेल्या रुग्णांमधील लक्षणे डेंग्यूसदृश होती. त्यामुळे त्या चौघा संशयिताच्या अहवालाची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान पूर्व दक्षतेसाठी नगरपरिषदेला शहर स्वच्छतेच्या दृष्टीने पत्र पाठवून सोयी सुविधा राबवण्यासाठी सूचना केली आहे. शिवाय आशा कार्यकर्त्यांकडून रुग्ण आलेल्या भागात सर्व्हे करण्याची सूचनाही केली असल्याची माहिती समुदाय आरोग्य केंद्राचे वैद्याधिकारी डॉ. दत्तात्रय दोडमनी यांनी दिली.
परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन
मे मध्ये 9, जूनमध्ये 13 व 6 जुलैपर्यंत 5 अशा 27 जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व रुग्णांवर तातडीचे इलाज करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, घरात अधिककाळ साठा केलेले पाणी सेवन करु नये, पाणी उकळून थंड करूनच सेवन करावे, वारंवार पाणी बदलावे, असे आवाहन बालरोग तज्ञ डॉ. मंदार हावळ यांनी केले आहे.