कोरोना विषाणूने जगभरात
धुमाकूळ घातल्यामुळे अनेक देशांनी लोकांच्या
येण्या-जाण्यावर
निर्बंध आणले आहेत. भारतानेही लॉकडाउनचा पर्याय निवडला. लॉकडाउनमुळे सतत कामात व्यस्त
असणार्या कलाकारांना घरी बसावं लागलं. बर्याच कलाकारांनी या मोकळ्या वेळेचा सदुपयोग
करण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री सोनल चौहानही त्यापैकीच एक. सोनलने इम्रान हाश्मीसोबत
‘जन्नत’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रिकरणाच्या
धामधुमीत कलाकारांना स्वतःसाठी अजिबात वेळ मिळत नाही. त्यामुळे लॉकडाउनमुळे मिळालेला वेळ स्वतःला
समजून घेण्यासाठी योग्य असल्याचं सोनलचं म्हणणं आहे. ती सांगते, कोरोना विषाणूमुळे आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष
परिणाम झाला आहे. मीही याला अपवाद नाही. जगभरातच चित्रपटक्षेत्रावर गदा आली आहे. चित्रपट,
मालिकांचं चित्रिकरण थांबवण्यात आलं आहे. माझेही काही कार्यक्रम रद्द
झाले. पण लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने लॉकडाउनचा निर्णय योग्यच आहे. या काळात मी
सकारात्मक राहिले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव येत्या काळात नक्कीच कमी होईल,
हा विश्वास वाटतो.
सोनल पुढे सांगते, आम्हा कलाकारांना स्वतःसाठी, कुटुंबासाठी अजिबात वेळ मिळत नाही. आम्ही सतत धावत असतो. या काळात मात्र धावपळ थांबली. स्वतःला वेळ देता आला. मी माझ्या बहिणीसोबत धमाल केली, चित्रपट बघितले, पुस्तकं वाचली. हा ब्रेक स्वतःला समजून घेण्यासाठी खूप उपयोगी पडला. अर्थात अशा कठीण काळात कोणीही घाबरून जाऊ नये. हा काळही जाणार आहे. पुन्हा चांगले दिवस येणार आहेत. आपण सगळे पुन्हा बिनधास्त फिरू शकू, असा मला विश्वास वाटतो. प्रत्येकानेच हा विचार करायला हवा.